जैवतंत्रज्ञान हे प्रत्येक घटकास उपयुक्त – डाॅ. अरविंद रानडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : सजीवसृष्टीतील घटकांचा उदाहरनार्थ सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी तसेच त्यापासुन मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा, शेती, मानवी आरोग्य, पर्यावरण संरक्षण इत्यादी क्षेत्रात उपयोग करून घेणे हे जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येते. जैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करून ते प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, डीपार्टमेंट ऑफ  सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी, भारत सरकारचे डायरेक्टर डाॅ. अरविंद रानडे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स अँड सायन्स आयोजीत ‘जैवतंत्रज्ञान संशोधनातील नवकल्पनाः आव्हाने आणि पध्दती’ या विषयावरील दोन दिवसीय दुसऱ्या आंतर राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. रानडे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. मायक्रोबायोलाॅजिस्ट सोसायटी इंडिया, उरल फेडरल युनिव्हर्सिटी, रशिया, स्वीडिश साउथ एशियन नेटवर्क फाॅर फर्मेटेड फूडस्, आनंद (गुजरात), रिसर्च युनिव्हर्सिटी, ताश्कन्द (उझबेकिस्तान) यांच्या सहकार्याने ही परीषद आयोजीत करण्यात आली होती.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी ताष्कंदच्या डाॅ. दिलफुजा एगाम्बरदीवा, मायक्रोबायोलाॅजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. अरविंद देशमुख, प्राचार्य डाॅ. समाधान दहिकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. परीषदेस जगभरातुन सुमारे ६५० रिसर्च स्काॅलर, प्राद्यापक उपस्थित होते. यावेळी परीषदेत सामाविष्ट झालेल्या शोध निबंधांची स्मरणिका प्रसिध्द करण्यात आली.

प्रारंभी डाॅ. दहिकर यांनी सर्वांचे स्वागत करून परीषदेचा हेतु स्पष्ट  केला. मायक्रोबायोलाॅजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. अरविंद देशमुख म्हणाले की, जगभरातील बायाटेक्नाॅलाॅजी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात आमंत्रित करून संजीवनीने मोठी किमया साधली आहे. याबद्दल त्यांनी व्यवस्थान व महाविद्यालयातील परीषद आयोजक समितीचे अभिनंदन केले.

दोन दिवसीय परीषदेमध्ये ताश्कंद (उझबेकिस्तान)च्या डाॅ. दिलफुझा एगाम्बरदीवा, बायोटेक्नाॅलाजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कोन्सिल, भारत सरकारच्या चिफ मॅनेजर डाॅ. माधवी चंद्रा, बायोइरा लाईफ सायन्स, पुणेच्या आशा साळुंके, उदयाना युनिव्हर्सिटी, बाली (इंडोनेशिया) चे डाॅ. ड्रा रेन्टो कावुरी, युनिव्हर्सिटी ऑफ राजशाही, बांगलादेशच्या डाॅ. तन्झिमा येस्मिन, म्हैसुरचे शास्त्रज्ञ डाॅ. प्रकाश हलामी, नेपाळचे रिसर्च ऑफिसर डाॅ. बिष्णु मारासिनी, कामधेनु युनिव्हर्सिटी, गुजरातचे डाॅ. सुब्रोतो हाती, पश्चिम बंगालचे डाॅ. बिप्रांश कुमार तिवारी व अबुधाबी युनिव्हर्सिटी, युएईचे डाॅ. जाॅली जॅकाॅब यांनी बायेटेक्नालाॅजी संदर्भात सादरीकरण करून सर्वांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी डाॅ. अशोक चव्हाण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट, डाॅ.प्रकाश हलामी यांना बेस्ट रिसर्च स्काॅलर व डाॅ. सुनिल पवार यांना बेस्ट अकॅडेमिशियन या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. दोन दिवसीय परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयिका डाॅ. सरीता भुतडा यांच्यासह सर्व प्राद्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.