व्यक्तिची उंची कर्तृत्वार ठरते – बिपिन कोल्हे

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमधील अंगभुत पैलुंना विकसीत करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. शिकत असताना ज्ञान ग्रहन करून भविष्यात ते आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाने सिध्द केल्यास लोक नतमस्तक होतात. कोणत्याही व्यक्तिची उंची ही त्याच्या शारीरिक उंचीवर न ठरता ती कर्तृत्वावर ठरते, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या २३  व्या वार्षिक पारितोषिक  वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमात  बिपिन  कोल्हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रगतशिल शेतकरी, उद्योजक, कवी, लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सुरेश  कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे, नाॅनअकॅडमिकचे विश्वस्त ज्ञानेश्वर सांगळे, प्राचार्य डाॅ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 

            बिपिन कोल्हे पुढे म्हणाले की, अयोध्येतील प्रभुरामाची  मुर्ती बनविण्यासाठी नेपाळ मधील गंडकी नदीतील शाळीग्राम खडक आणला आहे. सध्या आपण त्या खडकाकडे दगड म्हणुन बघतो. परंतु त्या दगडातुन जेव्हा श्रीरामाची  मुर्ती  साकारली जाईल, तेव्हा लाखो भाविक त्या मुर्तीशी  नतमस्तक होतील. तसेच विद्यार्थ्यांचेही  असते. शिक्षण  घेत असताना विद्यार्थ्यांवर  वेगवेगळे संस्कार घडत असतात, त्यातुन मोठेपण प्राप्त होते, भविष्यात  असे विद्यार्थी कर्तृत्व सिध्द करतात, तेव्हा समाजही त्यांच्याशी  नतमस्तक होतो.

काही पालक शिकू शकले नाही म्हणुन आपल्या पाल्याला तरी आपण चांगले शिक्षण द्यावे , ज्ञानाने समृध्द करावे, असे स्वप्न उराशी  बाळगत ते आपल्या पाल्यांना काहीही कमी पडू देत नाही. म्हणुन विद्यार्थ्यांनीही  संधीचे सोने करावे. सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण  घेतल्यावर सैन्यातच जाता येईल, असे नाही, कारण इ. १२ वी नंतर अनेक स्पर्धा पार कराव्या लागतात. परंतु सैनिकी स्कूलमध्ये जी शिस्त  लागते, ती आयुष्याला  शिस्त  लावते, आणि जीवन यशस्वी होते.

संजीवनी सैनिकी स्कुलमध्ये शिस्तीचे धडे जरी मुलं घेत असले तरी तीच शिस्त पालकांनाही लागते. सुरेश कोल्हे हे सातारा येथिल केंद्रीय मिलीटरी स्कूलचे १९६२  च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहे. तेथे मिळालेल्या शिस्तीमुळे त्यांनी वेगवेगळया क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करीत वयाच्या ७० व्या वर्षीही  तरूणांना लाजवेल, असे कार्य करीत यशस्वी जीवन जगत आहे.

माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या शिक्षणाविषयीच्या तळमळीबध्दल ते म्हणाले की त्यांचे विशेष  करून ग्रामिण भागातील विध्यार्थी घडला पाहीजे अशी तळमळ असायची, म्हणुन ते वयाच्या ९४ व्या वर्षी देखिल सैनिकी स्कूल, आदिवासी आश्रम स्कूल व प्रि कॅडेट ट्रेनिंग ग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची चौकशी करायचे. सैनिकी स्कूलचा मुख्य गाभा हा शिस्त असुन येथिल मुलांमुळे पालकामध्ये शिस्त लागत आहे, ही जमेची बाजु आहे, असे सांगुन कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  कौतुक केले.

            प्रमुख पाहुणे सुरेश कोल्हे म्हणाले की, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) ही खुप मोठी समस्या आहे. तेव्हा वसुंधरा वाचविण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, असा संदेश  दिला. निसर्गाने आपणास भरभरून दिले आहे, परंतु त्याचे योग्य पध्दतीने संवर्धन केल्यास धरतीवर स्वर्ग निर्माण होईल, असे त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगीतले.

          यावेळी सुमित कोल्हे म्हणाले की संजीवनी शिक्षण  संस्थेला ४० वर्षांची  यशस्वी शैक्षणिक  परंपरा आहे. प्रत्येक विद्यार्थी येथुन चांगला घडला पाहीजे, यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कटीबध्द आहोत.

    उपप्राचार्य प्रा. दरेकर यांनी अहवाल वाचन करून प्रगतीचा आलेख मांडला. मिलीटरी बॅन्ड, सुंदर रंगमंच, उत्तम ध्वनी व्यवस्था व लायटींग आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी बाबी या संमेलनाचे  ठळक वैशिष्ट्ये होत. संतोष सुर्यवंशी व नाना वाघ यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.