मुलीचे झाले दोन विवाह, आता घातला तिसऱ्याला गंडा

शेवगाव पोलिसात तक्रार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : उपवर मुलाला मुलीचे स्थळ आणून टोपी घालण्याचे सध्या पेवच फुटले आहे. तालुक्यातील नविन दहिफळ शिवारात ऊस तोडीसाठी आलेल्या विवाह इच्छुक मुलाला अगोदर एक नव्हे तर दोनदा विवाह झालेले  असतानाही नवरी मुलीने आणि तिच्या दलालानी जवळपास लाखभर रुपयाला टोपी घातल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात काल दाखल झाली आहे. विशेष म्हणजे नवऱ्या मुलीचा अगोदर विवाह झालेल्या एका मुला विरुद्ध पोटगीचा दावा  न्यायालयात चालू असताना देखील या मंडळींनी या ऊस तोड मजूर युवकास गंडा घातला आहे.

       नाविन दहिफळ शिवारात सुनील आप्पा मगर यांचे कडे ऊस तोडणीसाठी आलेल्या संकेत विजय  घोक्षे (वय २८, रा. घोगस पारगाव , तालुका शिरूर जिल्हा बीड ) यांनी काल शेवगाव पोलीस ठाण्यात आपल्याला फसवल्याबाबत आणि त्या पोटी घेतलेल्या रोख ५० हजार रुपये व दागिने परत मिळण्यासाठी मुलीच्या तसेच मध्यस्तांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

      या संदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन महिन्यापूर्वी राहुल नगर तालुका पैठण येथील शीला बबन खडसन, बबन सोनाजी  खडसन ,सतीश बबन खडसन तसेच गोकुळा संदीप चाबुकस्वार रा. पिंपळवाडी तालुका पैठण व प्रकाश पैलवान रा. शेवगाव हे सुनील मगर यांचे घरी नवीन दहिफळला आले. त्यांनी माझे आई-वडिलांना आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगितले. आई-वडिलांनी त्यांना आम्हाला मुलाचे लग्न करायचे  मात्र मुलीने मुलांबरोबर ऊस तोडीचे काम केले पाहिजे अशी त्यांना कल्पना दिली.

त्यावेळी त्यांनी माझ्या आई-वडिलांना आमची मुलगी तुम्हाला देतो, ऊस तोडीचे काम सुद्धा ती करीन. मात्र तुम्हाला पन्नास हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे सांगितले. त्यावेळी  आई वडील मुलगी मुला बरोबर काम करणार म्हणून पन्नास हजार रुपये देण्यास तयार झाले. त्यानंतर आई-वडीलांनी ५० हजार रुपये रक्कम सुनील मगर यांचेकडून उचल म्हणून  घेऊन मुलीच्या वडिलांना दिली. त्यानंतर मगर यांचे घरीच लग्न लावण्यात आले. लग्नात मुलीला पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम सोन्याचे कानातील फुले, दहा-भाराच्या चांदीच्या पट्ट्या व पाच भाराचे पायातील चांदीचे जोडवे असे सोन्या-चांदीचे दागिने घेतले.

त्यानंतर नातेवाईकासमक्ष नऊ ऑक्टोबर २०२२ ला लग्न लावण्यात आले. नवरी मुलगी दोन दिवस माहेरी जाऊन आल्यानंतर मात्र नवीन नवरी म्हणून सुरुवातीला आम्ही ऊस तोडीस तिला नेले नाही. त्यानंतर पंधरा दिवसांनी ऊस तोडीसाठी चल म्हटले तर तिने नकार दिला. आपण सर्वजण मिळून ऊसतोड करून घेतलेली उचल फेडू. असे सांगितले मात्र तिने दुखण्याचे नाटक करून येण्याचे टाळले. दवाखान्यातही येत नसे. यावेळी ती नातेवाईक व आई-वडिलांना सारखी फोन करायची. घरातील कामाला सुद्धा ती हात लावत नसे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी तिने आई-वडिल व भाऊ, बहीण यांना नवीन दहिफळला बोलावून घेतले. त्यांनी आम्हास आमची मुलगी न्यायची आहे म्हणून सांगितले.

त्यावर लग्नासाठी तुम्हाला उचल घेऊन दिलेले ५० हजार रुपये परत द्या. अशी मागणी केली  तेव्हा उलट आम्हाला दमबाजी करण्यात आली. नंतर फोन सुद्धा घेईना. म्हणून आम्ही नातेवाईकाकडे चौकशी केली असता ती नांदायला येणार नाही असे समजले. अधिक चौकशी केली असता या नवऱ्या मुलीचे या अगोदर दोन वेळेला लग्न झाल्याचे समजले. त्यातील आकाश अण्णासाहेब नरवडे (रा. चितेगाव तालुका पैठण ) याचे विरुद्ध तिने कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केला असल्याचे देखील समजले.

ही सर्व माहिती आमचे पासून लपवून  ठेवली म्हणून शीला बबन खडसन, बबन सोनाजी खडसन, सतीश बबन खडसन, तिघे राहणार राहुलनगर तालुका पैठण तसेच गोकुळा संदीप चाबुकस्वार रा.पिंपळवंडी तालुका पैठण, प्रकाश पैलवान पूर्ण नाव माहित नाही रा. शेवगाव यांचे विरुद्ध मुलीचे दोन वेळेस लग्न झालेले असतानाही ते लपून ठेवून आमचे कडून पन्नास हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली तसेच लग्नातील दागदागिने घेऊन गेली ते परत मिळावेत असे तक्रारीत म्हटले आह.