भगवान श्रीकृष्ण चेंडू फळी खेळण्यांत दंग होते, तर आजची युवापिढी मोबाईलमध्ये दंग झाल्याने शरीरयष्टीवर परिणाम – महंत रामगिरी महाराज

कोपरगांव प्रतिनिधी, दि २१ : भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असुनही त्याची आवड निर्माण होत नाही त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. 

रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, जगामध्ये आज क्रिकेट हा खेळ सर्वाधीक खेळला जातो त्याचा शोध भगवंत श्रीकृष्णाने लावला.  त्याकाळी त्याला चेंड फळी म्हणत. सवंगड्याबरोबर भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तीरी चेंडू फळी खेळण्यांत दंग होत असे पण आज कलीयुगात अभासी दुनियेत युवापिढी व्यस्त झाली आहे. मैदानी खेळ नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम शरीरयष्टीवर होऊ लागले आहे.

भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेंव्हा प्रत्येकाने अभासी दुनियेत स्वतःला किती गुंतवून घ्यायचे हे ठरविले पाहिजे., जेव्हा गरज असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा, ते व्यसन होईल हे टाळण्याचा प्रयत्न करावा. कोरोना महामारीत भ्रमणध्वनीचा विळखा आपल्या भोवती घट्ट बसला आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न करा., धार्मिक घटनांचे विवेचन करा, ग्रंथ वाचा त्यातून स्वतःला ज्ञान समृद्ध करा.

           भक्ताच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भगवान परमात्मा सदैव तत्पर असतात मात्र त्यासाठी आपल्या मुखात त्याचे नामस्मरण आले पाहिजे. मनाला सुमन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल जीवन क्षणभंगुर आहे हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही. माया मनुष्याला एकमेकांच्या नात्यापासुन दूर करत असते तिच्या किती अधीन जायचे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मायेच्या पलिकडेही वेगळी दुनिया आहे त्याच्या प्रवासासाठी साधना, नामस्मरण खुप महत्वाचे असते.

  यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णाला वात्सत्य दिले पण पुतना मावशीने शत्रुभाव दिला शेवटी भगवंताने त्या शत्रुभावाचा नाश केला. महर्षि वेदव्यासांनी श्रीकृष्ण भक्तीचा ग्रंथ श्रीमद भागवत लिहिला आहे. मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्‌गुणी विचार अधिक बलवान होतात. जसं कर्म असतं तसं फळ मिळतं असतं. काळ बदलला तशी साधनेही बदलली., मात्र आपल्याकडे वेळ भरपूर आहे ते जाणून घ्या.  

            वृंदावन येथुन आलेले कृष्णाजी महाराज यांनी बहारदार तांडव नृत्य करत भाविकांची मने जिंकली. गोवर्धन पर्वताची प्रतिकृती कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती, छोट्या मुलांना श्रीकृष्ण, पेंद्या, सुदामा अशा विविध रुपाने सजविण्यांत आले होते.

            भागवत कथा श्रवणासाठी बुधवारी महिलांनी गर्दीचा उच्चांक मोडुन टाकला. ज्ञानेश्वर नगर तहसील मैदान खचाखच भरले होते. नगरपालिका, पोष्ट कार्यालय इमारतीलगत मोकळ्या मैदानावर भाविकांची बसण्याची व्यवस्था करून तेथे थेट मोठे टी. व्ही स्क्रीन उभारून भागवत कथेचे प्रक्षेपण त्यावर दाखविण्यांत येत आहे;  गुरुवारी रुक्मीणी स्वयंवराचा सचित्र देखावा सादर करून रामगिरी महाराजांनी त्याची विस्तृत माहिती दिली.

 आत्मा मालिक, राघवेश्वर देवस्थान आदी पंचक्रोशीतील संत महंत मंडळींचे यावेळी ईशान बिपिनदादा कोल्हे यांनी सपत्नीक संत पूजन केले.             ग्रामीण भागातील वृद्ध मंडळी, वारकरी सप्रदाय, महिला, मिळेल त्या साधनाने श्रीमद् भागवत कथा श्रवणासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. कार्यक्रम नियोजनात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे स्वतः जातीने लक्ष देत आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या समाजकार्याची गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी विस्तृत माहिती देत त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकला. ईशान कोल्हे व सौ.श्रद्धाताई कोल्हे यांनी महंत रामगीरिजी महाराज यांचे संतपुजन केले