भाजप सरकार फक्त देश विकायचा बाकी आहे – ॲड. प्रताप ढाकणे

शेवगाव प्रतिनिधी, दि . ६ : भाजप सरकार शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या विरोधी आहे. शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे, औषधावर अठरा टक्के जीएसटी असून  हिऱ्यावर मात्र चार टक्के जीएसटी आकारली जाते. शेतकऱ्यांकडून १८ टक्के जीएसटी वसूल करून त्यातील ६ हजार रु शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली भूलभूलैया केली जाते.

या सरकारने महत्वाचे सर्व सार्वजनिक उद्योग व्यवसाय विकले असून आता फक्त देश विकायचा बाकी आहे. अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी केली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील दहिफळ गोळेगाव चापडगाव भातकुडगाव ढोरजळगाव शेवगाव आदी गावोगावी वाड्या वस्त्यावर प्रचार फेऱ्या काढून कोपरा बैठका घेत  मतदारासी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

ढाकणे म्हणाले, भाजपाचे खरे स्वरूप सर्वसामान्याना पटले आहे.  तालुक्यातील खरडगाव, मंगरूळ बु, राणेगाव, शिंगोरी या गांवानी मागील निवडणुकीत भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र गेल्या पाच वर्षात भ्रमनिरास झालेली   ही गावे बदल्यासाठी आता पेटली आहेत. येथील ग्रामस्थानी मते तर देऊच पण वर्गणी गोळा करून आर्थिक मदतीसाठी  देखील सरसावण्याची भूमिका आज घेतली आहे.

      राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे म्हणाले, भाजपने मागील दोन्ही निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही. देशात  प्रचंड महागाई व बेरोजगारी वाढली आहे. ठिकठिकाणच्या या प्रचार फेऱ्यामध्ये  केदारेश्वरचे उपाध्यक्ष  प्रा माधव काटे, सुनिल रासने माजी सरपंच राहूल मगरे, वजीर पठाण, एजाज काझी, बाळासाहेब डाके, राहूल वरे यांचेसह कम्यूनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष पाटील लांडे, कॉ.  संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता  फुंदे आदि अनेक कार्यकर्ते होते.