लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाने पडले बंद

ग्रामस्थांनी घेतली आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव

शेवगाव प्रतिनिधी , दि. २ : लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली. कासार पिंपळगाव ता.पाथर्डी येथे त्यांच्या निवासस्थानी शेकडो ग्रामस्थांनी आम्हाला पाण्यासाठी न्याय द्या म्हणत आपली व्यथा मांडली. कायम दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईशी दोन हात करणाऱ्या महिलांना यावेळी अक्षरशः अश्रू अनावर झाले.

सततच्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या सामनगाव ता.शेवगाव येथील ग्रामस्थांनी त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून ढोरा नदी व बंधारा खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या ३ एप्रीलपासून लोकवर्गणीतून सुरू असलेले हे काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आहे. मात्र स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहनिशा न करता महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिजाचे कारण पुढे करत काम बंद करण्यास भाग पाडले.

लोकसहभागातून सुरू असलेले काम अशा पध्दतीने बंद करण्यात आल्याने पाण्यासाठी सुरु असलेली गावची वाटचाल थांबली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाविरोधात महिला व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आता तुम्हीच आमच्या मायबाप आहात, तुम्हीच आम्हाला न्याय द्या. ग्रामसभेने रितसर ठराव व परवानग्या घेऊन, सर्व रेकॉर्ड पारदर्शी पध्दतीने ठेवलेले असताना केवळ किरकोळ राजकीय द्वेषातून केलेली कारवाई अन्यायकारक आहे.

पावसाळा तोंडावर आहे काम पूर्णत्वास जात असताना महसूल प्रशासनाने पाण्याच्या शाश्वत स्त्रोताच्या उपलब्धतेसाठी लढणा-या गावांना अशा पध्दतीने नाऊमेद करणे चुकीचे आहे. याबाबत आमदार राजळे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी प्रसाद मते यांना तातडीने तेथे बोलावून घेत प्रत्यक्ष कामाची तातडीने पाहणी करून सकारात्मक निर्णय घेण्याचा आदेश दिला.

यावेळी उमेश भालसिंग, संदिप सातपुते, भगवान कापरे, शिवाजी भिसे,भिमराज सागडे, मधुकर वावरे, सरपंच आदिनाथ कापरे, उपसरपंच संगिता नजन, सुनिता नजन, कानिफ म्हस्के, भागवत लव्हाट, बाबासाहेब गाडगे, राजेंद्र जमधडे, सुधीर म्हस्के, गणेश म्हस्के, भारत म्हस्के, दत्तात्रय दातिर, राजेंद्र जमधडे, झुंबरबाई दहीफळे, मिरा फाटके, व्दारका कापरे, सुनिता कापरे, लताबाई मिसाळ आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महीलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

ग्रामस्थांच्या लोकभावनेचा आदर करून संबंधित विषयाबाबत जिल्हाधिका-याशी चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू. – आमदार मोनिकाताई राजळे