काळे महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : केंद्र सरकारने २०२० पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०२४-२५ पासून सुरू होत आहे. त्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.  

 यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश वाघमारे तसेच वनस्पती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश खर्डे व एस. एम. बी. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त सिकंदर पटेल, प्राचार्य डॉ. विजया गुरसळ. समन्वयक प्रा. उमाकांत कदम उपस्थित होते.

डॉ. मंगेश वाघमारे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे याविषयी उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत हे सांगत असतांना महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने केलेले बदल स्वीकारून नवीन बदलांना सामोरे जावे लागणार आहे. प्राध्यापकांना क्रेडिट पद्धत अर्थात श्रेयांक पद्धत कशी असणार आहे विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य कसे असणार आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

डॉ. मंगेश खर्डे यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांना अभ्यासक्रमासाठी विषय कसे आहे उदाहरणासह स्पष्टीकरण सांगितले. एस.एम.बी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी सांख्यिकीय बदलासोबतच गुणात्मक बदलांना कसे सामोरे जायचे या संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून तालुकास्तरीय निवडीतून महाविद्यालयाची या वर्कशॉप साठी निवड केल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. या वर्कशॉपमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे झालेल्या बदलांची अंमलबजावणी करताना निर्माण झालेल्या शंका दूर झाल्या असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील विविध विषयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ विजया गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समन्वयक म्हणून प्राध्यापक उमाकांत कदम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्राध्यापक सागर मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.