नैसर्गीक शेती, आरोग्य आणि शिक्षणांत गुंतवणुक वाढीचा निर्णय क्रांतीकारी – बिपीनदादा कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी भारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदेत जो अर्थसंकल्प सादर केला त्यातुन नैसर्गीक शेतीला पाठबळ देवुन आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात गुंतवणुक वाढविण्यांचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी असुन सुशिक्षीत बेरोगारांच्या हाताला काम देण्यांसाठी ५०० कंपन्यामध्ये वर्षभर इंटर्नशिप करण्याच्या निर्णयाचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी स्वागत करून अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पायाभुत सुविधा वाढविण्यांवर भर देत सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांगसुंदर आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. लाखाचा पोशिंदा शेतकरी राजा असुन त्याच्या उन्नतीसाठीच्या योजना प्रभावी आहे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक खुल्या अर्थव्यवस्थेत अकरा वरून पाचव्या क्रमांकापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करत आता तिस-या क्रमांकाकडे आगेकुच करण्यासाठी काम सुरू केले आहे. कोरोना काळानंतर जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत पडझड झाली पण भारतीय अर्थव्यवस्था सक्षम राहिली. देशात आरोग्याचे प्रश्न मोठे असुन त्यासाठी ५ लाख ८५ हजार कोटी रूपयांची तरतुद दुप्पर्टीने वाढविली आहे. सहकार, शेती क्षेत्राला आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घेवुन जाण्यांसाठी अनेक नवनविन उपाययोजना या अर्थसंकल्पात सादर करण्यांत आल्या आहेत. 

तीन लाख रूपये पर्यंत उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयांसाठी दिलासा कायम ठेवला आहे. व्यक्तीगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवुन त्यातुन ४० लाख कोटी रूपये थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले हे सर्वांत मोठे यश आहे.

            उच्च शिक्षणांसाठी १० लाख रूपयापर्यंत कर्ज त्याचबरोबर सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेत आता १० ऎवजी २० लाख रूपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. ग्रामविकासासाठी २ लाख ६६ हजार कोटी रूपयांची तरतुद करून सुर्यघर योजनेचा १ कोटी गरीबांना लाभ मिळवून देण्याचा निर्णय चांगला आहे. कडधान्य, तेलबिया उत्पादनांला प्रोत्साहन देवुन नैसर्गीक शेतीला पाठबळ देण्यांबाबतचे क्रांतीकारी पाउल उचलले आहे. विकसीत भारताची पायाभरणी यातुन वाढेल. 

   जगात भारत स्टार्टअप अंतर्गत रोजगार कंपन्या सुरू करणारा तिसरा क्रमांकाचा देश आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करकपातीत जे बदल केले ते या कंपन्यांना तारक आहेत. महागाई आटोक्यात आणुन सर्वच घटकांच्या प्रगतीत योगदान देणारा अर्थसंकल्प सादर करून भारतवासियांना मोठा दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात वित्तीय तुट कमी करण्यांवर भर देत बँकांचे थकीत एनपीए चे प्रमाणही नगण्य स्थितीत आणून ठेवले असेही ते म्हणाले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.