आदर्श काम करणाऱ्यांची समाज नेहमी दखल घेतो – विवेक कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि.९ : कुठल्याही संस्थेची प्रगती ही एकनिष्ठेने काम करणा-या कर्मचा-यांवर जास्त अवलंबुन असते, जगभर शेतक-यांचा मित्र म्हणून काम करणा-या इफको संस्थेचे अहमदनगर जिल्हयाचे उपमहाप्रबंधक दिनेश देसाई यांच्यातही तीच एकनिष्ठता असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. 

 इफको संस्थेचे अहमदनगर जिल्हा उपमहाप्रबंधक दिनेश देसाई ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन निवृत्त झाल्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखांना कार्यस्थळावर सोमवारी संजीवनी उद्योग समुह व सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्यावतींने छोटेखानी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. 

  प्रारंभी इफको एरिया मॅनेजर तुषार गोरड यांनी दिनेश देसाई यांच्याबरोबर केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी इफको संस्थेवर कार्यरत असतांना अहमदनगर जिल्हयाला कधीच खतांची अडचण भासु दिली नाही त्यात दिनेश देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे.

इफको आरजीबी सदस्या डॉ. रूपाली विघ्ने यांनी उपमहाप्रबंधक दिनेश देसाई यांच्या प्रत्येक कार्याची सर्वांनाच आठवण होईल असे सांगितले. उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अमृत संजीवनी बिझनेस ग्रुपचे मुख्याधिकारी योगेश इंगळे यांनी उपमहाप्रबंधक दिनेश देसाई यांच्या ३४ वर्षाच्या सेवा कार्याची माहिती दिली. 

कोल्हे पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक दिनेश देसाई यांनी इफको संस्थेविषयी असलेला जिव्हाळा कायम ठेवत एकाच संस्थेत ३४ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली हा आताच्या युवापिढीसमोर मोठा आदर्श आहे. शेतक-यांचा मित्र म्हणून इफको आज जगभर काम करत असुन त्याची वार्षीक उलाढाल सुमारे ६० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.

रासायनिक खतमात्रा वाया न जाता ती सुक्ष्मरित्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचावी यासाठी नॅनो युरिया, किटकनाशक फवारणीसाठी आधुनिक ड्रोन, खताबरोबर विमा, विविध कीटकनाशके, आदि प्रगत शेतीसुविधा शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविल्या आहे. इफकोचा नवनिर्वाचित संचालक झाल्याबरोबर बारा वर्षापासुन बंद पडलेला कोपरगांवचा खतरॅक पाईंट चालु करण्यांत दिनेश देसाई यांची मोलाची मदत झाली असे ते म्हणाले.

सत्कारास उत्तर देतांना दिनेश देसाई म्हणाले की, सहकारात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशाला गौरवास्पद ठरेल असे काम केले असुन त्यातुन त्यांनी शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविण्यांसाठी प्रामाणिक कष्ट उपसले त्याच पावलावर पाउस ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी काम केले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इफकोचे युवा संचालक विवेक भैय्या कोल्हे आज कार्यरत असुन त्यांच्या विचारांची दुरदृष्टी कल्पक आहे त्याचा संस्थेला निश्चित फायदा होईल.

राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद अहमदनगर जिल्हयाच्या नेतृत्वात आहे त्यांच्या हाताखाली अहमदनगर जिल्हयात एक नव्हे दोन नव्हे तर १३ वर्षे काम करायला मिळाले हेच माझेसाठी मोठेपणांचे लक्षण आहे. ज्या संस्थेत आपण काम करतो ते एकनिष्ठतेने करा, तेथील राजकीय, सामाजिक घटनांचा इतिहास भूगोल जाणून घ्या, छोटया छोटया गोष्टीत ज्ञान मिळविण्यांचा प्रयत्न करा, कामाला नाही म्हणू नका, शेतक-याच्या पोटी जन्माला आलो आणि शेतक-यांसाठीच काम करणा-या संस्थेत सेवा देण्याचा अभुतपुर्व योग आला हे आपले भाग्य आहे. 

याप्रसंगी कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, निलेश देवकर, रमेश घोडेराव, बापूसाहेब बारहाते, रमेश आभाळे, विलासराव माळी, मोहनराव वाबळे, बाळासाहेब पानगव्हाणे, ज्ञानदेव औताडे, विलास कुलकर्णी, संचालक बाजीराव जी. सुतार, संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, जैविक पीक नियंत्रण केंद्राचे डॉ. योगेश थोरात, डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे सर्व संचालक, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, शेतकरी सभासद, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी बाळासाहेब पानगव्हाणे यांनी आभार मानले सुत्र संचलन केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी केले.