तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करा – स्नेहलता कोल्हे

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जखमींची घेतली भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : तालुक्यात अलीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नुकत्याच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ग्रामस्थांवर बिबट्याने जीवघेणे हल्ले केले. शिंगणापूर येथे मंदाताई तुळशीराम पवार यांनी आपल्या लेकराचा दिव्यांशचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः मृत्यूला सामोरे जात अप्रतिम धैर्य दाखवले. आईच्या त्या निस्सीम प्रेमाला आणि शौर्याला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देऊन सलाम केला. त्यांनी मंदाताईंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला.

या भेटी दरम्यान कोल्हेंनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा करून बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनीही सतर्क राहावे, तसेच वनविभागाने प्रभावी पिंजरे लावून, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असे त्यांनी आवाहन केले.

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या दुसऱ्या घटनेत साधनाताई बाबर या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे. मुलाच्या प्रसंगावधानामुळे आईचा जीव या घटनेत वाचला आहे. या घटनेनंतर स्नेहलताताईंनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन साधनाताईंची भेट घेऊन विचारपूस केली. उपचाराबाबत आवश्यक ती मदत मिळावी, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असा ठाम आग्रह त्यांनी केला. या प्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष  पराग संधान, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गुट्टे, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. संजय उंबरकर, डॉ. अतिश काळे, डॉ. सुजाता ढिकले मॅडम, तसेच वनरक्षक किनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हेंनी सांगितले की, वनविभागाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांचा जीव वाचवणे हीच सध्या काळाची गरज आहे. प्रशासन आणि नागरिकांनी मिळूनच या संकटाचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी वनविभागाने आवश्यक त्या प्रकारे पिंजरे उपलब्ध करून द्यावे आणि अधिकची कुमक मागवत नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.

अनेकदा नातवावर हल्ला झाला की आजोबा देवदूत बनतात, कधी आईवर हल्ला झाला की मुलगा तर कधी बाळावर हल्ला झाल्यानंतर आई रणरागिणी बनते मात्र हे सर्व भयभीत करणारे वातावरण थांबले पाहिजे. सातत्याने रोज असे प्रसंग घडत आहे, यावर लोकप्रतिनिधीनी काम करणे गरजेचे आहे. नागरिकांना सातत्याने हे संकट सामोरे येते आहे त्यासाठी जर वेळीच कार्यवाही झाली नाही तर दुर्देवी घटना घडत राहण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. 

Leave a Reply