औषध फवारणीकडे पालीकेचे दुर्लक्ष – माजी नगराध्यक्ष पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव शहरात सध्या डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आजारांचे प्रमाण वाढताना शहरात दिसत आहे. तसेच वीजही सतत जात आहे. यामुळे शहरवांसीयांचे जगणे अवघड झाले आहे. नियमाप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आधी व पावसाळा चालू झाल्यावर औषध फवारणी होणे गरजेचे होते. परंतु जून महिना संपला, जुलै संपत आला, तरी अद्याप नगरपालीके कडून औषध फवारणी करण्यात आली नाही.

तसेच येत्या दोन दिवसात कॅनलला पाणी येणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. दुसऱ्यांदा कॅनलला पाणी येत आहे. सर्व तळे भरलेले असताना, आता परत पाणी येत आहे. असे असून देखील सुद्धा जनतेने मागणी करूनही आठ दिवसा आड होणारा पाणीपुरवठा नगरपालिका हा पूर्ववत चार दिवसात करत नाही. औषध फवारणी नाही, शहरातील रस्त्यांना पडलेली खड्डे देखील नगरपालिकेने बुजवले नाही .

कॅनलला दोनदा पाणी सुटून सुद्धा नगरपालिका पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करत नाही. दुसरीकडे नगरपालीका घरपट्टीचे वाटप मात्र घरोघरी जाऊन करत आहे, व पट्टी भरण्यासाठी मागणी करत आहे. जनतेला सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करायचे व दुसरीकडे एका अर्थाने जुलमी पद्धतीने आगाऊकर वसूल करायचा असा नगरपालिकेचा सध्याचा प्रकार चालू आहे. तरी नगरपालिकेने लोकांच्या मुलाबाळांच्या जीवाशी न खेळता तात्काळ औषध फवारणी डास निर्मूलनासाठी करावी व पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसात तात्काळ करावा.