कोपरगाव शहर व उपनगरांच्या विकासासाठी १० कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निधी मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या, उपनगरांच्या विकासासाठी स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला, असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोपरगाव शहराच्या लगत अनेक छोटी-मोठी उपनगरे वसलेली आहेत. या उपनगरातील नागरिकांना शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, भूमिगत गटारी आदी सुविधा मिळणे गरजेचे होते. त्यामुळे ज्याप्रमाणे मागील साडे तीन वर्षात कोपरगाव शहराचा विकास झाला, त्याप्रमाणेच या उपनगरांचा देखील सर्वांगीण विकास होवून नागरिकांना सर्व मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी नागरिकांची मागणी होती. त्याबाबत या उपनगरांच्या विकासासाठी निधी मिळावा याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होतो, त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या लगत हद्दवाढ झालेल्या भागात वसलेल्या नाईकनगर, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, सोसायटी, गोकुळ नगरी, शंकर नगर मागील पवार वस्ती, ओम नगर, गवारे नगर, गवारे वस्ती, अयोध्या नगरी, धोंडीबा नगर, हनुमान नगर, पवार वस्ती आदि उपनगरांसाठी तसेच हद्दवाढ झालेल्या इतर भागाच्या विकासासाठी स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शहर सुशोभिकरण, भूमिगत गटारी आदी महत्वाचे प्रश्न सुटले आहेत. त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या उपनगरांच्या विकासाचा देखील प्रश्न मार्गी लागला आहे.

उपनगरांच्या विकासासाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र्जी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे. ज्याप्रमाणे कोपरगाव शहराचा विकास करून शहरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या त्याप्रमाणे हद्दवाढ झालेल्या भागाच्या उपनगरातील नागरिकांना आजवर झालेल्या त्रासाची दखल घेवून विकास कामांसाठी १० कोटी निधी मिळविल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांनी आभार मानले आहे.

कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवला, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटीचा निधी दिला असून हे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी जवळपास २५ कोटी निधी आणला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचा व छोट्या मोठ्या पुलांचा विकास झाला असून शासकीय इमारती, शहर सुशोभिकरण, स्मशानभूमी विकास आदी विकासाचे प्रश्न सुटले शहर विकासाच्या बहुतांश अडचणी त्यांनी सोडवून केलेल्या विकासातून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवला आहे. कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील विकास करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी विशेष प्रयत्न करून स्वतंत्र १० कोटीचा निधी मिळविला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराबरोबरच हद्दवाढ झालेल्या भागातील उपनगरांचा विकास होवून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा मिळणार आहेत.