कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव नक्की आहे. जर निवडणूक मागील निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे ३० तारखेला झाली असती तरी विजय हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच होणार होता. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निवडणूक लांबली आहे त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांबरोबरच त्यांचे उमेदवार आणि कोपरगावकरांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे त्यामुळे २१ तारखेला राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचा होणारा विजय हा ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

विरोधकांनी आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका करून पाहिली तरी मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांनी माझ्यावर टीका केली मात्र माझ्या सातत्यपूर्ण सामाजिक कामामुळे कोपरगावकरांनी त्यांच्या टीकेला मतदारांनी गांभीर्याने घेतले नाही. विकासाच्या बाबतीत चाळीस वर्षात सर्व प्रकारची सत्ता असतांना दाखविण्यासारखे ज्यावर मतदारांचा विश्वास बसेल असे एकही विकास काम त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे त्यांनी समता पतसंस्थेची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचून कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक विकासापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला.

मात्र समता हि ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासावर चालते त्यामुळे त्यांनी कितीही गैरसमज पसरविले तरी समताच्या ठेवी वाढतच आहेत. त्यामुळे विरोधकांचे कोणतेच डावपेच त्यांना होणाऱ्या पराभवापासून वाचवू शकणार नाहीत. जरी ते सहकारी संस्थांच्या बाबतीत खोटा कळवळा दाखवत असले तरी मी त्यांच्या सोबत राहिलो आहे मला त्यांचा अगदी जवळून अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काकासाहेव कोयटे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचार प्रसंगी कोपरगाव शहरातील घोंगडी बैठकी दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काकासाहेव कोयटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत समता पतसंस्थेविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विरोधकांना विचारले असता त्यांनीच प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे की, परिवर्तन होणार आहे. हो नक्कीच परिवर्तन होणार आहे.

ज्यांच्याकडे ४० वर्ष आमदारकी आणि कोपरगाव नगरपालिकेची ४० वर्ष सत्ता असूनही कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांचा होणाऱ्या निवडणुकीत पराभव अटळ आहे. त्यामुळे त्यांनी कितीही आणि कुणावरही बिनबुडाची निराधार टीका केली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषद द्यायचे कोपरगावकरांचे ठरले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा ४० वर्षाचा पाणी प्रश्न सोडविला आहे आणि कोपरगाव शहराचा अपेक्षित विकास देखील केला असून त्यांचे विकासाचे व्हिजन कोपरगाव शहराला निश्चितपणे राज्यात नंबर एकवर घेवून जाणार आहे. त्यामुळे २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कोपरगावचे सुजाण मतदार विकासाला आडवे येणाऱ्यांना कधीच निवडून देणार नाही हि काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे.

निवडणूक हातातून सुटत चालल्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी समता पतसंस्थेच्या बाबतीत विरोधकांची सुरु असलेले पडद्यामागचे खालच्या पातळीवरचे राजकारण कोपरगावकरांनी ओळखले आहे. कोपरगावच्या जुन्या जाणत्या ज्या ज्येष्ठ नेत्यांनी कोपरगावचा आदर्श सहकार जपला आहे ज्याचे उदाहरण राज्याच्या राजकारणात दिले जाते. परंतु निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळे एकाही निवडणुकीत निवडून न आलेल्या अविचारी नेत्याने सहकाराला नख लावण्याचा केलेला प्रयत्न कोपरगावचे सुज्ञ मतदार कधीही खपवून घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काकासाहेव कोयटे यांनी यावेळी व्यक्त केला.


