रासायनीक खतांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या – आआमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 29/7/2026: पाऊस झाल्याने शेतक-यांनी अडचणीत असताना पैशांची जुळवाजूळव करून पेरण्या केल्या. पिके चांगली आहेत मात्र गरजेच्या वेळी त्यांना रासायनीक खते कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्या. युरियाची कृत्रिम साठेबाजी आपण सहन करणार नाही.  माझे खतांच्या पुरवठ्याकडे लक्ष असणार आहे. खत पुरवठ्याचे योग्य नियोजन करून शेतक-यांना दिलासा द्यावा. अशा सुचना आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

रासायनिक खत विक्रेते आणि कृषि अधिका-यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.आ.आशुतोष काळे म्हणाले, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पुढे पावसाबरोबरच सर्व परिस्थती अनुकूल राहील या भरवशावर नेहमीप्रमाणे फायद्या तोट्याचा विचार न करता शेतक-यांनी पेरण्या केल्या आहेत. या पिकांना वेळेवर युरियासह इतर आवश्यक रासायनिक खते उपलब्ध करून देणे ही आपली संयुक्त जबाबदारी आहे.

युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होते. शेतक-यांना मनस्ताप होतो. कृषी विभागाने मतदारसंघात नवीन पेरण्यांचा आणि पिकांचा आढावा घेऊन गरजेनुसार खतांचा अतिरिक्त साठा उपलब्ध करावा. मतदारसंघात युरिया खताची साठेबाजी,  कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.  शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडचण किंवा पिळवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, राहाता तालुक्याचे कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, राहुल कदम, वाळीबा उघडे, यांच्यासह कृषी सहाय्यक अशिकारी, रासायानिक खत विक्रेते, कृषीसेवा केंद्र चालक उपस्थित होते.

पाऊस उशीरा झाल्याने पेरण्या महिनाभर उशिरा झाल्या. पुढे पाऊस वेळेवर आला तर पिके चांगली येतील. मात्र  पावसाने पुन्हा डोळे वटारले तर उत्पादन कमी होवून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन  कृषी विभागाने केलेल्या अवाहनाला शेतक-यांनी सकारात्मक  प्रतिसाद द्यावा. पिक विमा हा उत्पन्नाच्या आधारावर दिला जात असल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा काढावा.-आमदार आशुतोष काळे.


Leave a Reply