स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे उपाय शोधा – आमदार विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 31 : भारतातील सुमारे ५० ते ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसह वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अन्न व सुरक्षा, औद्योगिक समस्या तसेच पाणी वितरण व्यवस्थेतील अडचणी सोडविण्यासाठी करणे आवश्यक आहे. हॅकॅथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजातील विविध स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे  नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपाय सुचवावेत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे  यांनी केले.

संजीवनी विद्यापीठ आयोजीत ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना विवेक कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते. यावेळी मंचावर तहसिलदार तथा पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी महेश सावंत, नगराध्यक्ष पराग संधान, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, व्हाईस चांसलर डाॅ. ए. जी. ठाकुर, सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, हनुमंत फेरे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

   या स्पर्धेत कोपरगांव आणि ग्रामिण भागातील शेती , शिक्षण , अन्न आणि सुरक्षा, दळणवळण, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, खुली नवकल्पना, आरोग्य, कचरा व्यवस्थापन अशा  स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित स्मार्ट पर्याय विद्यार्थ्यांकडून  मिळविण्यासाठी देशभरातील १०० टीमने(सुमारे ४०० इंजिनिअरींगचे विद्यार्थी) सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या वतीने रू १ लाख बक्षिस देण्यात येणार आहे तसेच आमदार कोल्हे यांनीही अधिकचे रू १ लाख बक्षिस जाहिर केले. अमित कोल्हे यांनी कचरा व्यवस्थापनाच्या सर्वोत्कृष्ट प्रोजेक्टला प्रायोजीत केला जाईल असे जाहिर केले.

यावेळी बोलताना विवेक कोल्हे यांनी युवकांना केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी  सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून देशातील युवा शक्ती हीच सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. या युवाशक्तीने देशाच्या आर्थिक प्रगतीत अधिक मोठे योगदान द्यावे.

   यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार महेश सावंत म्हणाले की, अश्मयुगापासून मानव सातत्याने प्रगती करत आला असला तरी विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाशी सुसंवाद राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या प्रगतीचे परिणाम समाजाला भोगावे लागतात, त्यामुळे तंत्रज्ञानाला संवेदनशीलतेची जोड देणे आवश्यक आहे. प्रत्येकजण काम करतो, मात्र समाजहिताचे कर्म करून पुढील पिढ्यांसाठी  शाश्वत मूल्य निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या हॅकॅथॉन स्पर्धेतून नवी ऊर्जा, नवे ध्येय आणि नाविन्यपूर्ण कल्पना उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच समाजातील मूलभूत समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या हॅकॅथॉन स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.

    अध्यक्षस्थानावरून बोलताना अमित कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना  दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे दूरदृष्टीपूर्ण स्वप्न होते. त्याच विचारातून संजीवनी विद्यापीठाची स्थापना झाली असून, ग्रामीण भागातील हे पहिले विद्यापीठ म्हणून ते विध्यार्थ्यांना  जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. आज देशासमोर अनेक आव्हाने आणि समस्या असल्या तरी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञान, कौशल्य आणि नवकल्पनांच्या बळावर युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
   डाॅ. ठाकुर यांनी सर्वांचे स्वागत करून या स्पर्धेची संकल्पना स्पष्ट  केली.

Leave a Reply