समताच्या कामकाजाचा महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा – सहकार मंत्री

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : देशातीलच नव्हे, तर परदेशातील पतसंस्था, बँकांनाही लाजवेल अशा प्रकारचे कामकाज समता पतसंस्थेचे आहे. समताच्या कामकाजाचा आदर्श महाराष्ट्रातील पतसंस्थांनी घ्यावा. तसेच महाराष्ट्रातील पतसंस्थांना शिस्त लावण्यासाठी, त्यांचे अत्याधुनिकीकरण करण्याचे काम काका कोयटे करत आहे. असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी काढले. 

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांनी समता पतसंस्थेला भेट दिली असता समता पतसंस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये आणलेल्या नवनवीन संकल्पनांची माहिती घेतली. विशेषत: पेपरलेस बँकिंग प्रणाली, व्हाउचेरल बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता वसुली पॅटर्न, समता सुधन गोल्ड लोन योजना, समता सहकार उद्योग मंदिर, समताज सहकार मिनी मॉल अशा विविध योजना व उपक्रम बघून ते प्रभावित झाले.

तसेच भारतातील सहकार क्षेत्रातील पहिले स्टार्ट अप सुधन गोल्ड लोनचे ब्रँड जिंगलचे उद्घाटन ही सहकार मंत्री अतुल सावे व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार मंत्री अतुल सावे यांचे स्वागत जनरल मॅनेजर सचिन भट्टड व सत्कार संस्थेचे जेष्ठ संचालक रामचंद्र बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा जनरल मॅनेजर सचिन भट्टड व ठेव प्रमुख संजय पारखे यांनी चित्रफितीच्या आधारे सादर केला.

मंत्री सावे पुढे म्हणाले की, समता पतसंस्थेने महाराष्ट्रात आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. समता पतसंस्थेच्या योजना व उपक्रम महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल.तसेच पतसंस्था चळवळीमध्ये संदीप कोयटे यांनी घेतलेल्या पुढाकाराप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर तरुणांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जेष्ठ संचालक रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, जितुभाई शहा कचरू मोकळ, गुलशन होडे, संदीप कोयटे, निरव रावलिया संचालिका शोभा अशोक दरक, भरत अजमेरे, सहकार विभागाचे अभिजित पाटील, कोपरगाव तालुका सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, अंतर्गत ऑडिटर श्री.स्वप्नील घन, राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, राहाता येथील गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर, समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कोपरगाव, गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

समता पतसंस्थेने तयार केलेल्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या माध्यमातून ९९.६७ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता समता देत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेचे एकूण कर्ज ५४७ कोटी रुपयांपर्यंतचे आहे त्यात कर्ज वाटपापैकी २२४ कोटी सोनेतारण कर्ज हे जगातील अतिसुरक्षित कर्ज आहे. काका कोयटे चेअरमन, समता पतसंस्था