टाकळी नाका ते खडकी रस्त्यावरील खड्डे बुजवून दुपदरीकरण करावे – ताराबाई जपे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : शहरातील प्रभाग कमांक १ खडकी येथे मोठया प्रमाणांत नागरीकीकरण झाले असुन लोकवस्ती दाट आहे. अंतर्गत दैनंदिन वाहतुकीकरता येथून टाकळी नाका ते खडकी हया जुन्या टाकळी रस्त्याला मोठया प्रमाणांत खडडे पडले आहेत ते तात्काळ बुजविण्यांत यावे व सदर रस्त्याचे दुपदरीकरण करावे अशी मागणी माजी नगरसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे यांनी केली आहे.

   त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांव यांना निवेदन दिले असुन सदर निवेदनांत म्हटले आहे की, जुन्या टाकळी रस्त्याने मोठया प्रमाणात वाहतुक वर्दळ सतत सुरू असते. रस्त्याला खडडे जास्त झाल्यांने त्यात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थी विद्यार्थीनींचे हकनाक बळी जात आहेत. जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे हे तहसिल कार्यालयात मासिक आढावा बैठक घेत असतात त्यातही हा प्रश्न चर्चेला आला. 

 खडकी प्रभागाच्या आसपास समतानगर शिंदे शिंगी नगर, गवारे नगर, शंकरनगर, साई लक्ष्मी कुबेर नगर, लोढा मंगल केंद्र, भारत गॅस गोडावून आदि विस्तार मोठया प्रमाणांत वाढला आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी दिवस रात्र ये जा सुरू असते. रस्त्याला खडडे पडल्यांने वाहनांचे व पायी चालणा-या पादचा-यांचे मोठे नुकसान होत आहे.

सध्याचा रस्ता अरूंद आहे वाहनांची वर्दळ वाढल्यांने त्यातुन अपघातांचे प्रमाण वाढले आहे तेंव्हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांव यांनी सदर रस्त्याचे खड्डे बुजवून त्याचे दुपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे अन्यथा याविरुद्ध खडकी प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा जपे यांनी दिला आहे.