नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रविकासास उपयुक्त – डॉ. विजय जोशी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. बदलत्या जगाबरोबर सर्व क्षेत्रांमध्ये वाटचाल करायची असेल तर आपल्यालाही त्याच्यासोबत राहावे लागेल, तरच आपण जागतिक स्पर्धेमध्ये टिकू. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असल्याने  त्या संदर्भात विद्यार्थ्यांशी अधिक संवाद होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक, प्रशासन व संस्थाचालक यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेताना या सर्वांचा सहभाग मोलाचा आहे.” असे प्रतिपादन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी येथे केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के. जे. सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आंतरविद्याशाखीय अध्ययन’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे होते.

डॉ. जोशी पुढे म्हणाले की “भावी पिढीच्या असणाऱ्या क्षमता आणि त्यांचे भविष्य यांचा विचार करून शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच पुढे जावे लागेल. अलीकडे सामाजिक प्रसार माध्यमांच्या गैरवापरामुळे तरुण पिढीची दिशाभूल होते आहे. त्यावर जे येते तेच सत्य समजण्याची चूक ही पिढी करीत आहे. या पिढीला त्यातून वेळीच सावरण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण त्या दृष्टीने यथार्थ आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये जवळपास 30-35 वर्षांनी अमुलाग्र परिवर्तन होते आहे. ही आश्वासक बाब असून सर्वांनी त्याचे स्वागत करावयास हवे.

पूर्वीची भारतीय ज्ञान-परंपरा यांचे पुनरूज्जीवन यानिमित्ताने होणार आहे. तसेच हे शैक्षणिक धोरण मानवी जीवन आणि शिक्षण यांचा समन्वय साधणारे आहे. आजच्या शिक्षण पद्धतीतील ज्या त्रुटी आहेत, त्याही यामुळे दूर होणार असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू कल्पून हे धोरण तयार करण्यात आले आहे व त्याची अंमलबजावणी करणे हे आता महाराष्ट्र शासनाने सक्तीचे केल्यामुळे काही दिवसात तुमचे महाविद्यालय हे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. आजच्या स्पर्धेत टिकू शकेल अशी आपल्या शिक्षणसंस्थेची व प्राध्यापकांची क्षमता आहे.

याप्रसंगी शिरूर (जि. पुणे) महाविद्यालयाचे प्राचार्य के. सी. मोहिते म्हणाले की, “या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही सकारात्मक गोष्टी आहेत. ते नव्या पिढीस बहुआयामी व कौशल्याभिमुख शिक्षण देणारे असून त्यापुढे काही राजकीय, सामाजिक, आर्थिक व नैसर्गिक अडथळे आहेत. मात्र त्यांना पार करण्याएवढी शक्ती आजच्या तरुणांमध्ये व भारतामध्ये नक्कीच आहे. अशोकराव रोहमारे यांच्यासारखे नेतृत्व या संस्थेला लाभले आहे. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे बघून मी अनेकदा प्रभावित झालो आहे.”

अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की, “आपले शिक्षण हे मातृभाषेतून मिळावे ही या शैक्षणिक धोरणातील बाब मला खूप भावली. माझे व डॉ. विजय जोशी सर यांचे शिक्षण ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर’ यासारख्या संस्थेतून झाले आहे. त्यामुळे त्याचे उपयोजन करण्याचा माझा प्रयत्न आहे व त्यासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांचे मला मोलाचे सहकार्य मिळत आहे.”

याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करतांनाच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख उपस्थितांसमोर प्रस्तुत केला या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अंतर्गत हमी कक्षाचे प्रमुख डॉ. विजय ठाणगे यांनी करून दिला. याप्रसंगी संस्थेचे सचिव एड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, महाराष्ट्राच्या विभिन्न महाविद्यालयातील उच्च शिक्षणात रुची असलेले अनेक मान्यवर प्राध्यापक, संशोधक व शिक्षण तज्ञ सहभागी झाले होते. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. आर. पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. वर्षा आहेर यांनी सूत्रसंचालन केले.