आमदारांनी शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी तारखा जाहीर केल्या काय? – बाळासाहेब वक्ते

शेतकरी पाट पाण्याच्या प्रतीक्षेत

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याचे आवर्तन १५ फेबुवारी तारखेला सुटणार असे आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले होते त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पंधरा तारखेला आवर्तन सुटले नाही व शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला, मग काय आमदारांनी फक्त शेतकऱ्यांचे मन जिंकण्यासाठी तारखा जाहीर केल्या कि काय असे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

               ते पुढे म्हणाले की, यावर्षी सर्वात जास्त पाऊस झाला आहे व धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली आहे पण पाणी पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही, आमदारांनी काय हवेतच आश्वासनांच्या फैरी झाडल्या की काय असा प्रश्न निर्माण होतो, रब्बी पिकाला एकच रोटेशन दिले ४० ते ४५ दिवसा ऐवजी फक्त पंधरा दिवसाचे या पंधरा दिवसाच्या रोटेशन नंतर आजमितीला कॅनलच्या कडेला असलेल्या बोरवेल, विहिरी, यांनी तळ गाठले आहे. सध्याची गहू हरभरा कांदा ही पिके शेतकऱ्यांनी पाट पाण्याच्या भरवश्यावर घेतलेली आहे परंतु वेळेवर रोटेशन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना पाणी कसे द्यायचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

        शेतकरी कर्ज काढून आपली शेती फुलवतो आता सध्या सर्व पिके पाण्यावर आली आहे कालवा समितीच्या बैठकीत आमदार असतात परंतु फक्त तारखा जाहीर करण्यासाठी कालवा समितीच्या बैठकीत फक्त तारखा जाहीर होतात परंतु शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही असे का ? सवाल संचालक  बाळासाहेब वक्ते यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात विचारला आहे. 

शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत दोन रोटेशन मिळायला पाहीजे होते असा पूर्वीपासूनचा नियम आहे, पाणी कमी असताना देखील रब्बीचे दोन दोन रोटेशन झाले होते आता रब्बीच्या काळात रोटेशन थांबल्यामुळे गहू कांदा शेवटच्या पाण्यावर आहे रोटेशन इतके काही लांबले आहे की गहू, कांदा  पिकांना पाणी भरूनही काही उपयोग होणार नाही त्यामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असुन शेतकऱ्यांची आर्थिक हानी होणार आहे आता उन्हाळ्यातील तीन रोटेशन हे फक्त उसाच्या पिकालाच उपयोगी पडणार आहेत.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कॅनलच्या कडेला कलवर्टचे काम सुरू आहे. परंतु ते काम रोटेशन झाल्यावर केले असते तरी चालले असते सध्या पिकांना रोटेशनची गरज आहे. या गोष्टीकडे आमदारांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं रोटेशन वेळेवर न झाल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

आमदारांनी सांगितल्याप्रमाणे पाट पाण्याचे नियोजन झाले नाही ते फेल गेले आहे परिणामी शेतकऱ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे अशा तिव्र शब्दात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.