सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने नवीन सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यात आले असून, या दुकानाचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

धोंडेवाडी येथील आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला हे स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी मिळावे, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ठोस काम करत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्यांच्या हिताला व विकासाला प्राधान्य देऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करत आहे.

शिंदे-फडणवीस सरकार हे गतिमान निर्णय घेणारे, वेगवान पद्धतीने काम करणारे सरकार असून, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचे विविध प्रश्न या सरकारने मार्गी लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धोंडेवाडी येथे नव्याने सुरू झालेले हे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत चालविण्यात येणार आहे.

या स्वस्त धान्य दुकानामुळे गावकऱ्यांना शासकीय दरात धान्य उपलब्ध होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी अवघ्या १०० रुपयांत एक लिटर पामतेलासह प्रत्येकी एक किलो रवा, साखर आणि हरभरा डाळ असा आनंदाचा शिधा रेशन दुकानाच्या माध्यमातून वितरीत केला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुन्हा एकदा १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून, यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर, एक लिटरची पामतेलाची पिशवी असे किट दिले जाणार आहे. याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

याप्रसंगी आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ. मंगल बाबासाहेब नेहे, सचिव सौ. मीना प्रभाकर नेहे, उपसरपंच सौ. रोहिणी राजेंद्र नेहे, निवृत्ती दरेकर, वाल्मिक नेहे, एकनाथ दरेकर, प्रभाकर नेहे, बाबासाहेब नेहे, गणेश नेहे, कैलास रहाणे, बंडोपंत थोरात, अण्णासाहेब भोसले, ज्ञानदेव थोरात, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, नवनाथ भडांगे, भाऊसाहेब भडांगे, राजेंद्र कोल्हे, रामदास भडांगे, नाना काकडे, बाळासाहेब काकडे, गोरक्षनाथ दरेकर, संजय थोरात, शांताराम नेहे, सीताराम काकडे, राजेंद्र टिळेकर, ग्रामसेवक, शांताराम दरेकर, भानुदास काकडे, अशोक थेटे यांच्यासह महिला बचत गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.