केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा – आमदार काळे

 कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६ व्या गळीत हंगामाची सांगता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे अंदाज चुकले असून अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले आहे. त्यामुळे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. देशांतर्गत साखरेला ३३०० रुपये दर मिळत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेला जवळपास ४००० रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घेतल्यास देशांतर्गत साखरेचा दर वाढणार असून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेल व कारखान्यांच्या देखील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाने ५ नोव्हेंबर २०२२ रोजी एम.ए.ई.क्यू. अंतर्गत फक्त ६० लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून निर्यातीमध्ये वाढ करून अतिरिक्त २५ ते ३० लाख मे.टन साखर निर्यातीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२/२३ च्या ६८ व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अलकाताई  बोरनारे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर व आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. १३३ दिवस चाललेल्या २०२२-२३ च्या गळीत हंगामात  ५ लाख २४ हजार ९४८ मे.टन ऊसाचे गाळप होवून ६ लाख ०७ हजार ४०० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.५७ टक्के मिळाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. 

मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांना दिलेली खते अतिपावसामुळे वाहून जावून ऊसाच्या मुळांना अपेक्षित असलेले अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे हेक्टरी १५ ते २० मे.टन उत्पादन कमी झाल्यामुळे गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर बंद झाला. पुढील गाळप हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरु होत असल्यामुळे व काही नवीन कारखाने सुरु होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तरीदेखील कार्यक्षेत्राबाहेरील ऊसावर अवलंबून राहण्यापेक्षा कार्यक्षेत्रात ऊसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे.

शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ.आर.पी. किंवा एस.एम.पी.पेक्षा जादा दिलेला कारखान्याचा नफा समजून प्राप्तीकर विभागाने त्यावर प्राप्तीकर लावला होता. या प्राप्तीकराच्या वसुलीसाठी कारखान्यांना नोटीसा देखील पाठवून प्राप्तीकर वसुलीचा तगादा लावला होता.त्या बाबत सर्व कारखान्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. परंतु त्याबाबत केंद्र सरकराने साखर कारखानदारीला दिलासा देतांना २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण निर्णय घेवून एफ.आर.पी. किंवा एस.एम.पी.पेक्षा जादा दिलेला दर नफा न समजता खर्च म्हणून धरण्याचा निर्णय घेवून ९५०० कोटीचा प्राप्तीकर माफ केल्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले. गळीत हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासद, कर्मचारी, अधिकारी त्याचप्रमाणे गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्टच्या सर्व ऊस तोडणी कामगारांचे व ट्रक धारकांचे आभार मानले.

याप्रसंगी माजी संचालक पद्माकांत कुदळे,एम.टी.रोहमारे,ज्ञानदेव मांजरे,काकासाहेब जावळे, कचरु घुमरे. व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे,शिवाजीराव घुले,दिनार कुदळे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, श्रावण आसने,गंगाधर औताडे,

जीनिंग प्रेसींगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, एक्झिक्युटिव्ह संचालक भिकाजी सोनवणे,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी मानले.