खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक कृषी खात्याच्या गंभीर तक्रारीने गाजली

शेवगाव प्रतिनिधी, दि . १० : दोन दिवसापूर्वी पंचायत समितीमध्ये झालेल्या खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत बळीराजांना सहकार्य करणाऱ्या विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांचा व प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला.

तसेच बळीराजा प्रति असहकार करणाऱ्या, कामाला सातत्याने दांड्या मारणाऱ्या काही कर्मचाऱ्यांबाबत देखील अनेकांनी केलेल्या गंभीर तक्रारींनी ही बैठक विशेष  गाजली. तक्रारदारांनी बैठकीत खुलेआम समोरासमोर तक्रारी तर केल्याच शिवाय त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मोनिकाताई राजळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याने तक्रारीचे गांभीर्य वाढले आहे.

        यावेळी  ‘माझी वसुंधरा ‘ योजनेअंतर्गत राज्यात दीड कोटीचे प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या वाघोलीचे  युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी रामनाथ वांढेकर तीन वर्षापासून गावचे कृषी सहायक म्हणून कागदोपत्री कार्यरत असले तरी ते कधीही गावात येत नाहीत. शेतकऱ्यांनी केलेले फोनही घेत नाहीत. घेतले तर उडवा उडवीची उत्तरे देतात. गेल्या तीन वर्षात कृषी खात्याची एकही योजना गावात राबविली गेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी लोकसहभागाचा समन्वय असला तर मोठी कामे होतात.

वाघोलीने लोक सहभागातून आदर्श गावचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. तरी कृषी क्षेत्रातील वैयक्तीक लाभाची एकही योजना या गावात राबविण्यात आलेली नाही. याचे कार्यकर्त्यांना शल्य आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी वाघोलीचा जलयुक्त योजनेत  समावेश केला आहे अशावेळी असा बळीराजाप्रति असहकाराची भूमिका घेणारा कृषी सहाय्यक नसावा. अशी मागणी भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बैठकीत केली.

 तर मळेगाव शेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव भिसे यांनी कृषी अधिकारी अंकुष टकले यांचे बद्दलच अतिशय गंभीर तक्रारी केल्या. गेल्या सात ते नऊ एप्रिल या काळात परिसराला अतिवृष्टी व गारपिटीने झोडपले. राज्य शासनाने त्याची दखल घेत पंचनाम्याचे आदेश दिले. मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिकाताई राजळे यांनी सकाळीच तालुक्यात ठिक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन दिलासा दिला. त्यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने पंचनाम्यासाठी अतिरिक्त सेवक उपलब्ध केले. तरीही कृषी विभागाचा एकही कर्मचारी मळेगावशेकडे पंचनाम्यासाठी फिरकला नाही.

म्हणून भिसे तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटले. पंचनाम्या बाबत विचारले असता कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी, ‘तुमचा पंचनामा झालाय ना बाकीच्याची पंचायत कशासाठी करता ? लोकांना काय शासनाच्या फुकटच्या पैशाची सवय लागली आहे’ अशी भाषा वापरली.  ते गावचे पंधरा वर्षे सरपंच राहिलेल्या आणि गावचे प्रमुख व्यक्ती म्हणून वावरणार्‍या भिसे यांच्या जिव्हारी लागली. याबद्दल भिसे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली.  तेव्हा टकले यांनी गावचे पंचनामे केली जातील असे सांगितले तरीही कृषी विभाग गावात फिरकलाच नाही.

त्यानंतर भिसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी बोराले यांना दूरध्वनी वर त्याबद्दल कल्पना दिली असता त्यांच्याच सूचनेनुसार व्हाट्सएप वर लेखी तक्रार पाठविली. त्यांनीही कृषी अधिकाऱ्याला समज दिली. तरीही आज तागायत कृषी खात्याचा कर्मचारी पंचनाम्यासाठी मळेगावशे ला फिरकलाच नाही. म्हणून भिसे यांनी खरिप नियोजन बैठकीत अत्यंत पोट तिडकीने कृषी खात्याच्या असहकाराचा पाढा त्यांच्याच समोर वाचून गावाचा अतिवृष्टीच्या लाभासाठी समावेश झाला नाही तर नाईलाजाने रस्त्यावर उतरून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर वातावरण काहीसे गंभीर बनले होते. त्यावर शिष्टमंडळ आमदार राजळे यांच्या कार्यालयात गेले. तेथे सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले.