नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पिक विम्याचे निकष बदला – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : पावसाळ्यात पाऊस पडतो अतिवृष्टी होते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात देखील पाऊस आणि सोबतीला गारपीट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असते. मात्र विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे पिक विमा भरूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पिक विम्याचे निकष बदला अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील तीन  चार वर्षापासून पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व वेळेवर पाऊस न पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भीतीपोटी असंख्य शेतकरी पिक विमा भरतात. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील अनेक नुकसानग्रस्त शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत असून विमा कंपनीचे निकष व जाचक अटी यासाठी कारणीभूत आहेत.

शेतकऱ्यांचे १०० टक्के जरी नुकसान झाले तरी विमा कंपनीकडून हे नुकसान ५० टक्केच ग्राह्य धरले जाते व विमा कंपनीकडून नुकसानीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत फोन कॉलच्या माध्यमातून विमा कंपनीला द्यावी लागते. परंतु झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरायला वेळ जातो. नुकसान झाल्यामुळे राज्यातून हजारो कॉल विमा कंपनीला करण्यात येत असल्यामुळे विमा कंपनीचा फोन कायम व्यस्त असतो.

त्यामुळे सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत विमा कंपनीकडे पोहोचत नाही. पिक विमा घेतांना सर्व कागद पत्रांची विमा कंपनी पूर्तता करून घेते व नुकसान झाल्यावर देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडून कागद पत्रांची पूर्तता होत नाही त्यामुळे नुकसान होवूनही पिक विमा घेतलेला असतांना देखील नुकसानग्रस्त शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे.

त्याचबरोबर विमा कंपनीने खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठी पावसाचा खंड, आद्रता व ट्रिगर याबाबत जे निकष लावले आहेत त्या निकषात देखील बदल करणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांकडे शेतकरी पिक विम्याची रक्कम भरतात. विमा कंपन्या मालामाल होतात मात्र शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो हि वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळे पिक विम्याचे निकष बदलणे अत्यंत गरजेचे आहे.  

लहरी हवामानामुळे कधी पाऊस पडेल हे काही सांगता येत नाही. पावसाळ्यात तर पाऊस पडतोच मात्र हिवाळा व उन्हाळा या ऋतूत देखील पाऊस पडत असून सोबतीला गारपीट होत आहे. पिक विमा घेणाऱ्या सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात का याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात जे निकष अडचणीचे आहेत अशा निकषांमध्ये बदल करावा.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल व जास्तीत जास्त शेतकरी पिक विमा घेतील यासाठी पिक विम्याच्या निकषात बदल करून शेतकऱ्यांना सावरण्यास मदत करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

जर शासनाला विमा कंपनीच्या निकषात बदल करण्यात अडचणी येत असतील तर शासनाच्या वाट्याची पिक विम्याची जी रक्कम शासन विमा कंपनीकडे जमा करते ती रक्कम व शेतकऱ्यांची पिक विम्याची भरलेली रक्कम एकत्र करून शासनाने ती रक्कम नुकसानग्रस्त शेकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल व विमा कंपनीकडे शेतकऱ्यांना हात देखील पसरावे लागणार नाही. – आ. आशुतोष काळे.