गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावून वहन क्षमता देखील कमी झाली होती. हे पाणी वाया जावू नये, पूर्ण क्षमतेने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले पाहिजे व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना देखील नियमित पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी उजवा-डावा कालवा दुरुस्तीचे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले.

महाविकास आघाडी सरकार असतांना तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून ३०० कोटी निधी मजूर करून घेतला आहे. त्यापैकी मंजूर झालेल्या ७२ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी ३६ कोटीची कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून निफाड तालुक्यातील रुई, देवगाव व कोपरगाव तालुक्यात ब्राम्हणगाव येथे कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघासह निफाड, शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य व अनेक पाणी पुरवठा योजना देखील या गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांवर अवलंबून आहे. या दोन्ही कालव्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून शेती सिंचनाचा, पाणी पुरवठ्याचा भार हे कालवे ब्रिटीश काळापासून वाहत आहे. 

नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यापासून ११० किलोमीटर पर्यंत वाहणारा उजव्या व ९० किलोमीटरपर्यत वाहत जाणारा डाव्या कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात होते तर दुसरीकडे छोटे पूल, एस्केप बंधारे, मोऱ्यांची बांधकामे मोडकळीस आल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी होवून त्याचा मोठा परिणाम सिंचनावर व या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या कोपरगाव शहरासह अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांवर होत होता.

            मागील अनेक वर्षापासून लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी डाव्या-उजव्या कालव्याच्या येत असलेल्या अडचणींची व पाणी पुरवठा योजनांना पाणी उचलण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेवून कालवे दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटीच्या निधीला मिळालेल्या मंजुरीतून प्रत्येक वर्षी १०० कोटी निधी मिळणार आहे. त्यापैकी मंजूर असलेल्या ७२ कोटी निधी पैकी ३६ कोटीची दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित ३६ कोटी निधीच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.