ऊस उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी आधुनिक लागवडीचे तंत्र आत्मसात करावे – सुरेश माने

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शेतक-यांच्या शेतात शाश्वत धनलक्ष्मीचा वावर वाढावा यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील तंत्रज्ञान स्वतः अभ्यासून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात त्याची यशस्वी अंमलबजावणी केली असुन शेतक-यांनी शाश्वत उस उत्पादन वाढीसाठी आधूनिक लागवडीचे तंत्र आत्मसात करून भविष्यातील एकरी शंभर मे. टन उत्पादनाकडे वाटचाल ठेवावी असे आवाहन उस तज्ञ सुरेश बाळासाहेब माने यांनी केले. 

           तालुक्यातील रवंदे येथील उत्सव मंगल कार्यालय तर शहाजापुर येथील आरती लॉन्स तसेच कार्यक्षेत्रातील सर्व गटातील उस उत्पादक सभासदांसाठी बुधवारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रती एकरी शाश्वत उस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव होते. 

             प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, दिवसेंदिवस घटणारे उसाचे उत्पादन वाढविण्यांसाठी कारखान्याचे अभ्यासु युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करून सभासद शेतक-यांना आधुनिक उस लागवडीचे तंत्र थेट त्यांच्या बांधावर शेतकी विभागामार्फत उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला आहे. उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

           उस तज्ञ सुरेश माने पुढे म्हणाले की, शेतक-यांना शाश्वत लक्ष्मी मिळवून देणारे पीक उस असुन त्याच्या लागवडीपासून ते थेट उत्पादनापर्यंत नेमकेपणाने काय काळजी घ्यायची याचे ज्ञान सभासद शेतक-यांनी अगिकारले तर एकरी शंभर में टनाच्यापुढे उसाचे उत्पादन घेता येते. ह्या पण विविध प्रयोगान्वये सिद्ध केलेले आहे. राज्यात २३८ साखर कारखाने असून एकरी ३८ वरून २५ मे. टनापर्यंत उसाचे उत्पादन खाली घरसले आहे. आज तंत्रज्ञान बदलत आहे. ठिबक सिंचनातून खते आणि पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. उसाबरोबरच आंतरपिके घेवुन उत्पन्नाचे मार्ग शोधता येतात.

शेतक-यांनी सुरू, आडसाली, पूर्व हंगामी उस लागवडीसाठी को ८६०३२, को ८००५, को १०००१, को ३१०२, को १८१२१, को १५०१२ को २६५ या अधिकच्या उस उत्पादन देणा-या बेणेंची निवड करावी. बाळ, कच्ची आणि पक्की भरणी उस लागवडीसाठी अत्यंत महत्वाची आहे. सरी इंग्रजी व्ही एैवजी यु अद्याक्षराप्रमाणेच ठेवावी. प्रत्येक हंगामनिहाय लागवडीचा कालावधी निश्चित असुन तो शक्यतो जेव्हढ्या लवकर लागवड केल्यास त्यातुन शाश्वत उस उत्पादन वाढते, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, आंतरमशागतीसह ठळक बाबींकडे शेतक-यांनी जाणीवपूर्वक लक्ष देवुन जमिनीचा पोत आणि पाणी पृथ्थकरण वेळच्या वेळी केलेच पाहिजे.

जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश मात्रा तपासून हे घटक कमी असल्यास त्याप्रमाणांत शेणखताबरोबरच सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करावा. शक्यतो साडेचार फुट रुंद सरी घेवुनच उसाची लागवड करावी. योग्य वेळी योग्य काम केल्यास शेतक-यांना त्याचे दृष्य परिणाम लगेच दिसुन येतात. भरपुर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास शेतक-यांना सहज एकरी शंभर में टनापेक्षाही अधिकचे उस उत्पादन मिळविता येते हे आजवर विविध प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन, शेतकी व उस विकास विभाग व त्यांचे सर्व सहकारी शेतक-यांच्या थेट बांधावर जाउन तात्काळ मार्गदर्शन करतात त्याचा लाभ प्रत्येक शेतक-यांनी घेवुन उसाचे शाश्वत उत्पादन वाढवावे असे आवाहन करून शेतक-यांच्या प्रत्येक शंकेचे त्यांनी यावेळी निरसन केले. 

           याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. निलेश देवकर, निवृत्ती बनकर, तुळशीराम माळी, कैलास माळी, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, रमेश आभाळे, मनेष गाडे, उषाताई संजयराव औताडे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, उषाताई संजयराव औताडे, ज्ञानदेव औताडे, ज्ञानेश्वर होन, सर्व संचालक, अशोक भाकरे, भिमराव भूसे, संतोष दवंगे यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, उस उत्पादक सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्नांची माहिती देऊन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी केले. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यानी आभार मानले.