टेंडरची मुदत संपल्याने गल्लोगल्ली साचले कचऱ्याचे ढीग

शेवगांव प्रतिनिधी, दि. ११ : शेवगाव शहरात विविध भागात गेल्या दोन महिन्यापासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या येत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, त्यामुळे साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्याच्या ढीगामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे.

याबाबत माहिती घेता या आधीच्या घनकचऱ्याच्या टेंडरची मुदत संपल्याने नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आली. मात्र निविदा काढण्याची प्रक्रिया वेळ काढूपणाची असल्याने नगरपरिषदेने आत्यआवश्यक सेवा म्हणून आपल्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत कचरा संकलन मोहीम राबवायला हवी.

     दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेवगाव नगरपरिषदेला ८ इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या उपलब्ध झाल्याची माहिती माध्यमातून देण्यात आली, मात्र या इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या अजूनही कचरा संकलनासाठी रस्त्यावर फिरकत नसल्याने याबाबतही नागरिकांतून प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पाऊस लांबलेला असला तरी कधीही पाऊस होऊन रस्त्यावर साचलेला कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवण्याचा धोका असल्याने नगरपरिषदेने तातडीने पावले उचलून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या तातडीने कार्यान्वित करण्याची  जनतेतून मागणी होत आहे.

        नगरपरिषदेच्या नगरसेवकांची मुदत तीन वर्षां पासून संपली असून तेव्हापासून नगरपरिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. त्यानंतर सगळा कारभार प्रशासक आणि आणि मुख्य अधिकारी पाहत आहेत. त्यांना जाब विचारणारे सभागृह अस्तित्वात नसल्याने सगळ्याच विकास कामाचा खोळंबा झाला आहे.  शहरातील अनेक स्ट्रीट लाईट गेले कित्येक महिने बंद आहे. तसेच शहरातील अनेक चौकात हाय मॅक्सचे विना दिव्याचे खांब नुसतेच उभे केले आहेत. बाजार वसुली घनकचरा संकलन योजना आदी विकास कामे रखडली आहेत. नगरपरिषदेचे कार्यालय शहरापासून लांब असल्याने तिकडे सहसा कोणी फिरत नाही. तसेच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचेही जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याची नागरीकातून तक्रारी आहेत.