कारगिल युध्द हे भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण देणारे – सुमित कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल आहे. तेथिल भारतीय लष्कराच्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने शिमला कराराचे उल्लंघन करून घुसखोरी केली. ऑक्सिजनची कमी असुन देखिल १८००० फुट उंच असलेल्या या पहाडी भागात भारतीय सैन्याने जीवाची पर्वा न करता २६ जुलै, १९९९ रोजी पाकिस्तान सैन्याला सळो की पळो करून कारगिल युध्द जिंकले. हे युध्द म्हणजे भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण देणारा दिवस आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्या बाबत नितांत आदर आहे.

सैनिकी स्कूलच्या कॅडेटस्ने सुध्दा आपल्या सैन्यदलातील शुरवीरांच्या कर्तृत्वातुन प्रेरणा घ्यावी’, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले. संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी ऑनररी कॅप्टन सुभेदार मेजर राजेंद्र चंद्रभान धुमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच डायरेक्टर ज्ञानदेव सांगळे, उपप्राचार्य कैलास दरेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमित कोल्हे हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परीसरातुन रॅली काढून ‘शहिद जवान अमर रहे’ च्या घोषणा देत परीसर दुमदुमून टाकला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील ‘अमर जवान’ समरकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस वसतीगृह प्रमुख सुभेदार मेजर ज्ञानेश्वर रूमणे, यांनी प्रास्तविकात कारगिल युध्दाचा पार्श्वभूमी सांगितली. धुमाळ यांनी सैनिक उंच डोंगरी भागात कसे कार्यरत असतात, या विषयी सांगत युध्दाच्या जागा, विविध बटालियनचे कार्य तसेच काही निवडक अधिकाऱ्यांचे व सैनिकांचे शौर्य सांगुन उपस्थितांच्या अंगावर रोमांच आणले.

काही सैनिक चुकून पाकिस्तानात गेले, तेथे त्यांना कैदी बनविण्यात आले व हाल करण्यात आले, असे धुमाळ यांनी सांगितले. सुमित कोल्हे पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांची ग्रामिण भागातील तरूणांना दर्जेदार शिक्षण मिळुन त्यांच्या हातुन देशाची सेवा घडावी, ही कायमची इच्छा असायची. त्यातुनच या संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था प्रगती करीत असताना विद्यार्थ्यांनीही आपले हित जोपासावे.

देशासाठी शाहिद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण ठेवत भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रध्दा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, तसेच वीरवृत्ती इत्यादींचा आदर्श ठेवावा, त्यांचे हे गुण आपणही अंगीकारावे, असे कोल्हे यांनी शेवटी सांगीतले.