कोपरगाव रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासासाठी २९ कोटी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी तयार केलेल्या, अमृत भारत स्थानक योजनेत कोपरगाव रेल्वे स्थानकाचा समावेश व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून, अमृत भारत स्थानक योजनेत, कोपरगाव रेल्वे स्थानकाचा समावेश होवून मिळालेल्या २९ कोटी निधीतून कोपरगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण होणार आहेत.

रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी कोपरगाव दौऱ्यावर आले असता, आमदार काळे यांनी रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्या त्यांच्याकडे मांडल्या होत्या. कोपरगाव रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रकल्प, रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म नंबर ३ ला लुक लाईन करून रुंदी वाढवने. मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे.

कांद्यासह जास्तीत जास्त शेतीमाल परराज्यात विक्रीसाठी पाठविणेकामी, कोपरगांव स्टेशन जम्बो साईडिंगला लुक लाईनमध्ये वर्ग करून कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे, जम्बो गुड्स शेड मंजूर करावे, अशा अनेक समस्या मांडल्या होत्या. त्या समस्यांची रेल्वे विभागाने दखल घेवून, त्याची तातडीने अंमलबजावणी करताना, रेल्वे प्रशासनाने कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिप्टचे काम हाती घेवून पूर्ण केले आहे. तसेच रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण व्हावे यासाठी राज्य व केद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.

त्या पाठपुराव्यातून सोलापूर विभागातून १५ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली असून, पुनर्विकास होणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या यादीत कोपरगाव रेल्वे स्थानक घेण्यात आले. कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी २९ कोटी रुपये निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. या निधीतून रेल्वे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

यामध्ये, ओव्हर हेड ब्रिज, बारा मीटरचा रस्ता त्याचबरोबर संपूर्ण रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या सर्व रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवार (दि.०६) रोजी सकाळी ११ वाजता करणार आहे. कोपरगाव रेल्वे स्टेशनचा लवकरच पुनर्विकास होवून रेल्वे प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळणार आहे. त्यामुळे कोपरगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करून २९ कोटी निधी दिल्याबद्दल, आमदार काळे यांनी केंद्र व राज्य शासनाचे तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहे.