सैनिकांच्या बलिदानाची स्मृती स्मरणात राहण्यासाठी शिलाफलकाची उभारणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : १४ ऑगस्ट २०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या माधव कचेश्वर आढाव माध्यमिक तांत्रिक विद्यालय (शाळा क्र.६) येथे मोठ्या उत्साहात माजी सैनिकांच्या हस्ते व मुख्याधिकारी शांताराम गोसावी व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.                           

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” म्हणजेच “माझी माती माझा देश” हे अभियान दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जसे की शिलाफलक अनावरण, वसुधा वंदन, स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन, पंचप्राण, शपथ आणि ध्वजारोहण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या शहरामध्ये आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमिसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे.

आज देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना समर्पित असा शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शहरातील माजी सैनिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी हातात दिवे घेऊन पंचप्राण शपथ घेतली.

जीवन जगत असताना सैनिकांचे बलिदान आपण स्मरणात ठेवून आपण आपले कर्तव्यनिष्ठा पार पाडली पाहिजे, असे मार्गदर्शन नगराध्यक्ष वहाडणे यांनी उपस्थितांना केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. त्या सैनिकांचा गौरव व्हावा, त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी, या उद्देशाने हा शिलाफलक उभारण्यात आलेला आहे.

देशप्रेमाची वात लहानपणापासूनच मनात तेववावी याकरिता या शिलाफलकाची स्थापना या शाळेत करण्यात आली, सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या शिलाफलकाच्या स्मृती मनात ठेवून देशाभिमान बाळगावा, असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी यावेळी केले. सदर अनावरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना गवांदे यांनी केले, तर आभार श्रीमती अर्चना बोराडे यांनी मानले.