थकीत कर्ज वसुलीसाठीचा कायदा अधिक गतिमान होण्यासाठी योग्य ते बदल करणार- अनिल कवडे 

कोपरगाव प्रतिनिधी दि. १८ : महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये राज्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसुली साठीचा कायदा अधिक प्रभावशाली व गतिमान होण्यासाठी योग्य ते बदल करणार असल्याची ग्वाही सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित शिर्डी येथील प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा बोलत होते. तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा, तालुका फेडरेशनचे पदाधिकारी तसेच सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. प्रसंगी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित प्रतिनिधींसोबत प्रत्येक मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. त्या नंतर सहकार आयुक्तांसमोर मागण्यांबाबतचा मसुदा चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला.

प्रसंगी काका कोयटे म्हणाले की, देशातील १७ ते २० टक्के मालाची नासाडी साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे होत असते. भारतात उत्पादित होणाऱ्या भाजीपाला, फळांची कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसल्याने नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही नासाडी रोखण्यासाठी सहकार खात्याने वेअर हाऊस व स्टोरेज बांधण्यासाठी परवानगी द्यावी. 

तसेच या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन असल्यामुळे युवा प्रतिनिधी समीर जैन यांच्या हस्ते अनिल कवडे यांचा सत्कार करण्यात आला. राज्य फेडरेशनच्यावतीने अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते पतसंस्थांच्या अडी – अडचणी, विविध प्रश्न, समस्या विषयीची माहिती पेन ड्राईव्हमध्ये साठवून तो पेन ड्राईव्ह निवेदन स्वरूपात सहकार आयुक्तांना देण्यात आला.

शिबिराचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या सुरेखा लवांडे यांनी केले. शिबिरात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, संचालक ॲड. अंजली पाटील, भास्कर बांगर, वासुदेव काळे आदींसह नंदुरबार जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. कांतीलाल ताटीया, जळगाव जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, भंडारा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सारवे, कोल्हापूर जिल्हा फेडरेशनच्या वतीने फेडरेशनचे सर व्यवस्थापक दिपक पाटील, सांगली जिल्हा फेडरेशनचे गडचे,

सोलापूर जिल्हा फेडरेशनचे दिलीप पतंगे, पुणे जिल्हा फेडरेशनचे महादेव वाघ, पालघर जिल्हा फेडरेशनचे शहरात जाधव, बीड जिल्हा फेडरेशनचे चंद्रकांत शेजुळ, ठाणे जिल्हा फेडरेशनचे सर्जेराव शिंदे, जालना जिल्हा फेडरेशनचे अभय कुलकर्णी, अहमदनगर जिल्हा फेडरेशनचे सुरेश वाबळे, वसंत लोढा, नाशिक जिल्हा फेडरेशनचे नारायण वाजे तसेच पतसंस्थांचे प्रतिनिधी, पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. उपस्थितांचे आभार संचालक भास्कर बांगर यांनी मानले.