गणेशाची कृपा दृष्टीमुळे पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : अखेर परिसरावर गौरी गणेशाची कृपा दृष्टी झाली आणि तब्बल दोन महिन्याच्या दीर्घ कालखंडाच्या विश्रांती नंतर गुरुवारी (दि.२१) सायंकाळी तालुक्यातील सर्वच भागात पावसाचे बर्‍यापैकी आगमन झाले. त्यामुळे परिसर आनंदला आहे. तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाची दाणादाण झाली. पीके कोमेजली काही भागात तर पिण्याच्या पाण्याची, जनावराच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली.

विविध पक्ष व संघटनानी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी उपोषणे, मोर्चे, निवेदने, रास्ता रोको अशा माध्यमांतून प्रशासनाला जेरीला आणले. तसेच विविध गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना करताना तसेच घरोघरी बसविण्यात आलेल्या गौरींना पाऊस पाडण्याची, परिसरातील ओढे नाले वाहते व्हावेत अशी विनवणी केली.

कदाचित त्यामुळेच गौरी गणेश भक्तांच्या विनवणीला पावले असून आता पर्जन्य राजा गणेशोत्सवात गुंतल्याने आता गणेश विसर्जना पर्यंत रोज काही वेळ कां होईना तो हजेरी लावल्याशिवाय रहाणार नाही. अशी भाविकाची भावना झाली आहे. गुरुवारच्या पावसाने माना टाकलेल्या कपासी तूर बाजरी भुईमुग आदि खरिप पिकाना जीवदान मिळाले असून काही प्रमाणात का होईना उत्पादन हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र आणखी दमदार पाऊस आवश्यक असून येथील ओढे नाले वाहते व्हावेत तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या निम्माही पाऊस झाला नाही त्यामुळे येथे दुष्काळाच्या संकटाची तीव्रता वाढली होती.


गुरुवारचा पाऊस तालुक्यात सर्वत्र झाला असून सरासरी ६२ . ७० मिलिमीटर ( अडीच इंच ) पाऊस झाला असून मंडल निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे ..
शेवगाव – ६७ मिलिमीटर. एरडगाव – ८५ मिमी. दहिगावने – ७५ मिमी. भातकुडगाव – ५९ मिमी. चापडगाव – ५७ मिमी. बोधेगाव – ५१ मिमी . व ढोरजळगाव – ४५ मिमी. 

तालुक्यात कपासीची सर्वाधिक ४७ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. मात्र पावसा अभावी कपासीची वाढ खुंटली. त्यातच कपासीवर लाल्या रोगाचा प्रादर्भाव वाढल्याने उत्पन्नास मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचे चित्र तयार झाले होते. ऊसा बरोबरच कपासीच्या आर्थिक उलाढालीवर परिसराच्या बाजार पेठेचे भवितव्य अवलंबून असल्याने तोंडावर आलेल्या दसरादिवाळी सारख्या सणाच्या काळात बाजार पेठेची उलाढाल मंदावली होती. अशा वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले असून, शुक्रवारी देखील पावसाचे वातावरण कायम असल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत होत असल्याचे जाणवतो आहे.