विवाहासाठी वधू-वारांची वैचारिक कुंडली जुळने आवश्यक – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सध्याच्या काळात लग्न जुळविण्यासाठी अनेक अडचणी येतात. समाजातील अनिष्ट चाली-रिती, रूढी, परंपरा यांच्या मागे न धावता विवाह जुळविण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे घेणे आवश्यक आहे. वैचारिक कुंडली जुळली तर मुला-मुलींनी इतर गोष्टीची तडजोड करून विवाहास तयार होणे ही काळाची गरज आहे, असे मत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने शिर्डी येथे हॉटेल ‘शांती कमल’ मध्ये रविवारी (२२ ऑक्टोबर) वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता कोल्हे बोलत होत्या. यावेळी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले, राष्ट्रीय महिला अध्यक्षा संध्या राणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंत,

रोजगार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षा छाया खर्डे, पुणे जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ शेजवळ, मेळाव्याचे आयोजक तथा नगर जिल्हाध्यक्ष दीपक धट, नगर जिल्हा उपाध्यक्ष बापू सुराळकर आदींसह मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी, वधू-वर, त्यांचे पालक तसेच मराठा समाजबांधव व भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मराठा समाजातील मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. लग्नासाठी तरुण-तरुणींच्या व त्यांच्या पालकांच्या खूपच अपेक्षा असतात. मात्र, त्या पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते. बाह्यरुपाला महत्त्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच विवाहासाठी अनुरूप जोडीदार मिळून उत्तम संसार होणे शक्य असते.

सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात नोकरी किंवा उद्योग, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या समाजबांधवांच्या भेटी-गाठी होत नसल्याने वधू-वर परिचय मेळावा ही आता काळाची गरज बनली आहे. प्रत्येक समाजात वधू-वर परिचय मेळावा होणे गरजेचे आहे. त्यामुळे लग्न जुळण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर वेळेची व खर्चाचीदेखील बचत होते. अशा मेळाव्यातून उपवर मुले-मुली एका व्यासपीठावर येतात, त्यांचा एकमेकांशी परिचय होतो, एकमेकांच्या अपेक्षा समजतात. पसंती मिळाल्यास ऋणानुबंध जुळतात. 

वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम होते व त्या माध्यमातून एकमेकांमध्ये आपुलकीचे नाते तयार होते. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम केले आहे. मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह जुळविण्यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे सातत्याने आयोजन करण्याचा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगून स्नेहलता कोल्हे यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजहितासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने कार्य करावे, अशा शुभेच्छा देऊन याकामी संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.