पाच दशकांपासून सुरू असलेल्या निळवंडेच्या संघर्षाला आले यश – माजी आमदार कोल्हे

शिर्डी विमानतळावर पंतप्रधान यांचे कोल्हे यांनी केले स्वागत 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळावर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरातील वातानुकूलित नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन, उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे जलपूजन व धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण, काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन सुसज्ज टर्मिनल इमारतीचे व अन्य विकासकामांचे भूमिपूजन,

महाराष्ट्रातील ८६ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना आर्थिक लाभ देणाऱ्या राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ, अहमदनगर येथील शासकीय रूग्णालयातील आयुष हॉस्पिटलसह आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल व वायू आदी क्षेत्रातील सुमारे १४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत करून कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदींसह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विश्वनेता नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक सक्षम, दूरदर्शी, कुशल, कर्तृत्ववान व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे कणखर पंतप्रधान लाभले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. गेल्या ९ वर्षांत त्यांनी सेवा, सुशासन व गोरगरिबांचे कल्याण यावर भर देत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र अवलंबत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

त्यांनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकार सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असल्याचे सांगून स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरण, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विविध विकासकामे मार्गी लावल्याबद्द्ल कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने सरकारचे मन:पूर्वक आभार मानले.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी नगर, नाशिक जिल्ह्यातील व मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला अतितुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याची योजना शासनाकडे मांडून सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेचे स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले आहे.

तब्बल ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे काम अखेर पूर्ण झाल्यामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व सिन्नर या तालुक्यातील १८२ गावांमधील सुमारे ६८८७८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असून, जिरायत भागातील पाण्याचा प्रश्न सुटून हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. स्व. शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ११ गावांचा निळवंडेच्या लाभक्षेत्रात समावेश झाला आहे. या धरणाचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचल्याने हा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी गेल्या पाच दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे, असेही त्या म्हणाल्या.