हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकजूट दाखवावी – माजी आमदार कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : लाखाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची उपलब्धता निर्माण होण्यासाठी पंथ, झेंडे, आपसातील मतभेद बाजुला ठेवुन सर्वपक्षीयांनी नगर-नाशिकची एकजुट दाखवावी असे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले. गोदावरी खो-यासाठी अन्यायकारी असणारा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करावा. मेंढेगिरी समितीने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांचे कंबरडे मोडले तेव्हा या समितीच्या शिफारशीनुसार चालु वर्षी पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने जायकवाडीला उर्ध्व गोदावरी खो-यातुन पाणी सोडु नये असे त्या म्हणाल्या.

 गोदावरी खो-यावर सातत्याने बिगर सिंचन पाण्याचे आरक्षण टाकुन मायबाप सरकारने शेतक-यांना हक्काच्या शेती पाण्यापासून वंचित ठेवु नये, आमच्या व्यथा समजुन घ्या, जायकवाडीला पाणी सोडू नका, ज्याप्रमाणे नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग बनविला त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवून शेतक-यांच्या जीवनात आनंद निर्माण करून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाणी वाद कमी करावा असे विवेक कोल्हे म्हणताच लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिल कार्यालयासमोर शुक्रवारी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्यावतीने एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. त्याचे निवेदन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व तहसिलदार संदिप भोसले यांना देण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या झेंड्याचे यावेळी अनावरण करण्यात आले.

प्रारंभी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी उपस्थितांना लाक्षणिक उपोषणाची भूमिका समजावली. संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले यांनी प्रास्तविकात कोल्हे कुटुबियांनी पाणी संघर्ष व जलसमृध्दीसाठी काय कामे केली याची माहिती दिली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. 

जायकवाडीच्या पाण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधीची एकजुट आहे. मग आम्ही सातत्याने आवाहन करून येथील आमदार झोपेचे सोंग घेत आहेत काय, सर्वांनी एक व्हा. बळीराजाचा टाहो त्यांनी ऐकावा, आम्हाला पाउस नाही, पाणी नाही, हक्काचे ब्लॉक नाही, शेती सिंचन व्यवस्थेसाठी अधिकारी नाही, तेव्हा चालू हंगामात जेमतेम पाणी आहे ते तरी सोडु नका, कालवे सल्लागार बैठक तात्काळ घेवुन रब्बीचे तीन आणि उन्हाळा दोन असे पाच आर्वतने तात्काळ द्या असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.

कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोस, माजी सभापती सुनिल देवकर, उत्तम चरमळ यांनी कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जायकवाडी तूपाशी, नगर-नाशिक उपाशी, समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा तातडीने रद्द करा, मेंढेगिरी समितीचा अहवाल रद्द झालाच पाहिजे, गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे आदी घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे दारणा, गंगापुर धरणांवर वाढणारे बिगर सिंचन आरक्षणामुळे हक्काच्या गोदावरी कालव्यांच्या ११ टीएमसी पाण्यात घट झाली.

त्याची तुट काश्यपी (१ टीएमसी), गीतमी (टीएमसी), वालदेवी (१.५ टीएमसी), मुकणे (४.५ टीएमसी), भाम (टीएमसी) भावली (१ टीएमसी), मुकणे उंचीवाढ (२.५ टीएमसी प्रस्तावीत) असे ९ टीएमसी पाणी उपलब्ध केले. त्यामुळे ३५ वर्षे गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यासह पिण्यासाठी व औद्योगिकीकरणासाठी कमतरता कधीच जानवु दिली नाही. याशिवाय तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खो-यात घेण्यासाठी सातत्याने स्वतःच्या सरकारविरुध्द शेतकरी, सभासद, सहका-यांच्या मदतीने रस्तावर उतरत संघर्ष करत थेट मंत्रालयावर धडक मारत सातत्याने लढा दिला आणि २००० साली विधीमंडळात त्यास मंजुरी मिळविली, हा संघर्ष कदापीही विसरून चालणार नाही. 

कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या भावना आणि निवेदनाच्या मागण्या शासनापर्यंत कळवून गोदावरी कालवे नुतणीकरणाच्या कामाला वेग देवु असे त्या म्हणाल्या. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी गोदावरी कालवे लाभधारक क्षेत्रातील सर्व शेतकरी युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे आकाश नागरे, अमित आढाव, शिवसेनेचे कैलास जाधव, संजय सातभाई, अनिल सोनवणे मनसेचे अनिल गायकवाड, आदी सामाजिक संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दिला. 

या मागण्यांमध्ये कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीचा फेर अभ्यास गटाचा अहवाल आल्याशिवाय जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, गोदावरी कालव्यांना शेती सिंचन पिण्यासाठीचे नियोजन तात्काळ जाहीर करावे, गोदावरी लाभक्षेत्रात स्थगित केलेले बारमाही ब्लॉक तात्काळ चालू करावे, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करावे, कोपरगाव राहता तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, पश्चिमेचे पाणी पूर्वीकडे वळवावे, ३० वळण बंधारे तातडीने पूर्ण करण्यात यावे, कृष्णा खोऱ्याच्या धरतीवर दमणगंगा,

पिंजाळ, उल्हास, वैतरणा खोऱ्यातील समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी युद्ध पातळीवर नियोजन करावे, गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेऊन गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेती व पिण्याचे पाण्याचे नियोजन जाहीर करावे, वैतरणा धरणाची साठवण क्षमता वाढवून ते पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, वैतरणा सॅडल गेट काम तातडीने पूर्ण करावे याचा समावेश आहे. याप्रसंगी बाळासाहेब वक्ते, दीपक चौधरी, अनिल सोनवणे, सुनील देवकर, राजेंद्र देवकर, यादव संवत्सरकर, कैलास माळी, साहेबराव रोहम आदींची भाषणे झाली.