कोरोना काळापासून एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ :  ‘बेटी बचाव बेटी पढावा’ या उपक्रमाचा राज्य व केंद्र शासन मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करत असताना ग्रामीण परिसरात अनेक शाळकरी मुलींना शाळेत जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही. अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी व्यक्त केली.

 फुंदे पुढे म्हणाले कि, शेवगाव तालुक्यातील मठाच्या वाडीतील ५०-६० मुलींना नजीकच्या शहरटाकळी व दहिगावने येथे शाळेसाठी पायी जावे लागते. गेली काही वषापूर्वी शेवगाव मठाचीवाडी एसटी बस होती. मात्र, कोरोनाच्या काळात ती बंद करण्यात आली. त्यानंतर बंद पडलेली एसटी पूर्ववत सुरु करण्याची मागणी अनेकदा करण्यात येऊनही अद्याप सुरु झालीच नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून मठाचीवाडी येथील शाळकरी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पायपीट करण्याची पाळी आली आहे. तर काही मुलींना शिक्षणालाच मुकावे लागले हे दारुण सत्य आहे, मुली शिकल्या पाहिजेत. त्या शिकल्या तर समाज सुधारणार आहे, असे ते शेवटी म्हणाले.