सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ – आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : सर्वच लाभधारक शेतकरी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सात नंबर पाणी मागणी अर्ज  दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही ज्या लाभधारक शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२३-२४ साठी संरक्षित उभ्या भुसार, बारमाही, फळबागा तसेच सर्वच प्रकारच्या पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून दोन आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही अडचणीमुळे अनेक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल करू शकले नाही.

गोदावरी कालव्याच्या सल्लागार समितीच्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांना आवर्तनांसंबंधी येत असलेल्या अडचणी मांडून दुष्काळी परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांचे खरीप हंगामात झालेले नुकसान याचा विचार करून उन्हाळी आवर्तन देण्यासाठी देखील नियोजन करावे अशी आग्रही मागणी केलेली आहे. तसेच आवर्तन सुरू असतांना पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होण्यासाठी आवर्तन काळात विस्कळीतपणा येणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत.

चालू वर्षी झालेल्या अतिशय कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, तूर, आदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहता रब्बी हंगामात पिकांना पाण्याची कमतरता भासू नये व एकही लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू नये यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप जे लाभधारक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले नाहीत त्या लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज ५ डिसेंबर पर्यंत तातडीने दाखल करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.