शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयवर संघर्ष मोर्चा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कोपरगाव तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. उठ सैनिका जागा हो, संघर्षाचा धागा हो, श्रमिक मजदुर संघाचा विजय असो, शालेय पोषण आहार संघटनेचे विजय असो आदी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला.

मोर्चा प्रसंगी जिल्हा अध्यक्षा सविता महेंद्र विधाते, जिल्हा सचिव विद्या अभंग, कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील आदींनी आपल्या भाषणातून वीस वर्षापासून 300 रुपये पगारापासून पोषण आहाराचे काम करत असतानाचे सांगितले. काही ठिकाणी चुली तर काही ठिकाणी याचा वापर होत आहे. या ठिकाणी दुर्घटना घडली तर आम्हाला विम्याचे संरक्षण नाही कमी पगारात झाडून घेण्यापासून स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचे काम करावे लागते. तुटपुंज्या पगारावर काम करणारे हे शासनाचे कर्मचारी आहेत.

एक तर आम्हाला दारिद्र रेषेखालील कार्ड द्या किंवा अधिवेशनात 15 हजार रुपये पगार करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आली. यामध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन रुपये 15000 मिळाले पाहिजे. शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्या, ज्या शाळेमध्ये आहार शिजवण्याची भांडे कमकुवत झाले आहेत. त्यांना नवीन भांडी द्यावी, इतर केडरप्रमाणे स्वयंपाकी व मदतनीस यांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे, इतर आस्थापना प्रमाणे पुरेसा युनिफॉर्म मिळवा, कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून काढण्यात येऊ नये.

वरील मागण्या आपल्या मार्फत शासन दरबारी मांडून त्या सोडवाव्यात अशी तालुका संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. मोर्चास उपाध्यक्ष मोनाली ठाणगे, सुरेश गायके, सोनाली उगले, पूजा बोरकर, वाल्मीक पाठक, कल्पना शिरसागर, आशा घोलप, सारिका गडाख, बाबासाहेब खरे, सुहास गायकवाड, शेख गुलाब, मीनाक्षी तांबे, गायकवाड सुरेश, गायके आधी हजर होते.