प्राध्यापक शेटे यांचे ग्रामीण भागातून भारत घडविण्याचे काम – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : श्रीगणेश शैक्षणिक संकुल पारंपारिक शिक्षण न देता आधुनिक व नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. यामुळेच संकुलाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. ग्रामीण भागातून भारत घडविण्याचे काम प्रा.विजय शेटे करत आहे, असे मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केले. श्रीगणेश संकुलात “महाराष्ट्र माझा” या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राहाता आदर्श सरपंच पुरस्कृत भास्कर पेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सकाळ वृत्तपत्राचे जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, माजी विद्यार्थी सिद्धेश डुंबरे, श्री गणेश संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी बापू पुणेकर आदि उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी संत आणि आदर्श व्यक्तींचे आचरण व आदर्श घेतले पाहिजे. स्वतःला समृद्ध करण्यासाठी माता-पिता यांची सेवा करणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही गोष्ट आदर्श करण्यासाठी विचार व कृती आदर्श असावी लागते असे मत, आदर्श सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. कोऱ्हाळे येथे हरितक्रांती होण्यापूर्वी श्री गणेश शैक्षणिक संकुलाने शिक्षणक्रांती केली आहे. कोरड्या भूमीवर ज्ञानाचा मळा फुलविला, असे मत सतीश वैजापूरकर यांनी व्यक्त केले.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा वापर स्मार्ट पद्धतीनेच केला पाहिजे, असे मत माजी विद्यार्थी सिद्धार्थ डुंबरे याने व्यक्त केले. स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहाता ते विचारांचे संमेलन बनले, संकुलात स्नेहसंमेलन दरम्यान खवय्यांसाठी स्वादिष्ट खाद्यपदार्थाचे स्टॉल आकर्षण बनले. स्नेहसंमेलनात साधारण २१०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच चार हजार पालक वर्गाने आपल्या चिमुकल्यांच्या कलेचा आनंद अनुभवला.