ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ :– कोपरगाव नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे. परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होवून अद्यापपर्यंत कामे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगावकरांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी सदर रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या. त्या रस्त्याचे काम नुकतेच सुरु झाले असून आ. आशुतोष काळे यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम रस्त्याचे काम रखडले होते. त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद ठोस भूमिका घेत नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत आंदोलन करून लवकरात लवकर काम सुरु करावे याबाबत कोपरगाव नगरपरिषदेला लेखी निवेदन देखील दिले होते. कोपरगाव शहरातील मंजूर असलेली सर्व कामे लवकरात लवकर सुरु करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

परंतु कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम या रस्त्याच्या कामाला सबंधित ठेकेदाराने सुरुवात केलेली नव्हती त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी स्वत: या रस्त्याची पाहणी करून सबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या दर्जाचे काम करावे. कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी देखील रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना देवून कडक शब्दात तंबी दिली आहे.