सर्व्हिस रोडसाठी निधी मंजूर केल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांचे आभार – प्रदीप चव्हाण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील धोत्रे, भोजडे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच (खु.), घारी, देर्डे कोऱ्हाळे, पोहेगाव या गावांतील समृद्धी महामार्गालगतचे सर्व्हिस रोड बनविण्यासाठी ५२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या सर्व्हिस रोडमुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी राज्य शासनाचे व स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोपरगाव तालुक्यातील १० गावातून गेलेला आहे. कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाची लांबी ३० किलोमीटर इतकी आहे. एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग तयार करण्यात येत असून, समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (कोपरगाव) या ५२० कि. मी. च्या पहिल्या टप्प्याचे व शिर्डी ते भरवीर ८० कि.मी. च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे.

उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव मतदारसंघातील दळणवळण, शेती, व्यापार, उद्योग, पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून, राज्याच्या सर्वांगीण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे वेळेची व इंधनाची बचत होऊन वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आम्ही समृध्दी महामार्ग गेलेल्या गावातील नागरिक या गोष्टीचे साक्षीदार आहोत की कोल्हे कुटुंबाने कधीच या महामार्गाला विरोध करून विकास कामात व्यत्यय आणला नाही त्यामुळे सातत्याने देवेंद्र फडणविस साहेब यांच्याकडे कोल्हे ताईंनी पाठपुरावा केल्याने भरीव कामे समृध्दी लगत होण्यास चालना मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही – प्रदीप चव्हाण

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांनी शासनदरबारी विशेष प्रयत्न करून मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे जनतेला भेडसावणारी रस्त्यांची समस्या सुटून दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

कोपरगाव, शिर्डीसह अनेक धार्मिक स्थळे समृद्धी महामार्गामुळे इतर भागांशी जोडली गेली असून, विकासाला गती मिळाली आहे. कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज समृद्धी महामार्ग निर्मितीचे स्वप्न साकार झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक रस्ते दुभंगले गेले. त्याचबरोबर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक अंतर्गत रस्ते समृद्धी महामार्गाच्या कामामुळे व जड वाहतुकीमुळे खराब झाले होते.

या खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तसेच अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे लावून धरली होती. तसेच त्यांनी मतदारसंघातील धोत्रे, भोजडे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच (खुर्द), घारी, देर्डे कोऱ्हाळे, पोहेगाव या गावांमध्ये समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्याची आग्रही मागणी करून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

अखेर स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, महायुती शासनाने हे सर्व्हिस रोड बनविण्यासाठी ५२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या सर्व्हिस रोडमुळे धोत्रे, भोजडे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच (खुर्द), घारी, देर्डे कोऱ्हाळे, पोहेगाव व परिसरातील जनतेची दळणवळणाची समस्या सुटणार आहे. त्यामुळे आम्ही राज्य शासनाचे व स्नेहलताताई कोल्हे यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी म्हटले आहे. स्नेहलता कोल्हे यांनी शासन स्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्व्हिस रोडसाठी भरीव निधी मंजूर झाला असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.