कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य-बिपीन कोल्हे

-स्व. कोल्हे साहेबांच्या सहकार मंत्रीपदाच्या काळात सहकाराला मोठी बळकटी- काकासाहेब कोयटे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या सहकारी संस्थांचे ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्य माणसांना आर्थिक आधार देणाऱ्या अशा सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, अशी कायम भूमिका घेऊन माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व माजी खासदार स्व. शंकरराव काळेसाहेब यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा पायंडा पाडला. कोपरगाव तालुक्याने घालून दिलेला हा आदर्श इतर भागातील सहकारी संस्थांनी घेतला पाहिजे. कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयासाठी जागा व इतर अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची मंगळवारी (१३ फेब्रुवारी) बैठक होऊन फेडरेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र निवृत्ती कोळपे तर उपाध्यक्षपदी ज्ञानदेव दगू मांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी राजेंद्र कोळपे यांचे नाव आशुतोष पटवर्धन यांनी तर उपाध्यक्षपदासाठी ज्ञानदेव मांजरे यांचे नाव दादासाहेब औताडे यांनी सुचवले. त्यास अनुक्रमे डॉ. गुलाबराव वरकड व चित्राताई वडनेरे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा वाळके यांनी काम पाहिले.

यावेळी फेडरेशनचे संचालक डॉ. गुलाबराव वरकड, दादासाहेब औताडे, राजेंद्र देशमुख, रंगनाथ लोंढे, आशुतोष पटवर्धन, हेमंत (हरिभाऊ) गिरमे, संतोष गायकवाड, चित्राताई वडनेरे तसेच माजी पं. स. सभापती शिवाजीराव वक्ते, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीचे उपाध्यक्ष केशवराव भवर, अंबादास देवकर, रामदास शिंदे, सतीश नीळकंठ, अतुल देशमुख आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष कोळपे व उपाध्यक्ष मांजरे यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तर नवनिर्वाचित संचालकांचा शिवाजीराव वक्ते व केशवराव भवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, नगर जिल्ह्याला व कोपरगाव तालुक्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या व व सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक सहकारी संस्थांची स्थापना करून त्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या, नावारूपाला आणल्या. सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यांचा आदर्श घेऊन आपण गेल्या ४० वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करीत असून, आजवर राज्य व देश पातळीवरील अनेक नामांकित संस्थांवर काम केले आहे. विविध संस्थांमध्ये काम करत असताना आपण नेहमी स्व. कोल्हेसाहेबांच्या शिकवणीनुसार गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.

गोरगरिबांना आधार देणाऱ्या सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत. सहकारात कुणीही राजकारण आणू नये. विकासासाठी, तात्त्विक मुद्द्यासाठी भांडण असावे; पण केवळ विरोधासाठी विरोध करू नये. सहकार क्षेत्र कठीण काळातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांच्या विकासासाठी अनेक चांगली धोरणे आखली असून, त्यांनी साखर कारखान्यांचा १० हजार कोटींचा आयकर माफ करून साखर उद्योगाला नवसंजीवनी दिली आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा व गोरगरिबांचा उद्धार करणे हीच ‘सहकारातून समृद्धी’ आहे. कोपरगाव तालुक्यात सहकारी पतसंस्थांचे मोठे जाळे पसरले असून, तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनने छोट्या पतसंस्थांच्या अडीअडचणी दूर करून त्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्रांचे आयोजन करावे, असे त्यांनी सुचवले.  

काकासाहेब कोयटे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी सहकारी संस्थांना नेहमीच पाठबळ देऊन सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी मोठे काम केले. स्व. कोल्हेसाहेब राज्याचे सहकारमंत्री असताना सर्वात जास्त पतसंस्थांना मंजुरी देण्याचे काम त्यांनी केले. स्व. शंकरराव कोल्हे साहेब व स्व. शंकरराव काळेसाहेब यांनी कोपरगाव तालुक्यात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध घडवून आणल्या. आज कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करून आम्ही ही परंपरा कायम राखली आहे.

याकामी बिपीनदादा कोल्हे, आ. आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, नितीन औताडे व सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मिळाले. या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेली सहमतीची एक्सप्रेस अशीच चालू राहावी. गेल्या महिन्यात झालेल्या तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सतीश नीळकंठ यांनी ११ सभासदांना मतदानाचा हक्क परत मिळवून दिला. याकामी त्यांना राजेंद्र देशमुख यांनी मोलाची साथ दिली.