जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंब्या देण्यासाठी भातकुडगावात दोन तास रास्ता रोको

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ :  तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी अकरा ते एक या वेळेत रस्ता रोको करण्याचा आदेश पाळत तब्बल दोन तास रस्ता रोको करून शासनाचा निषेध करण्यात आला. सग्य-सोयऱ्यांच्या काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे.

या सह इतर मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील भातकुडगावफाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी लग्न तिथी असल्याने वऱ्हाडी मंडळीनां घेऊन जाणारी अनेक वाहने या रस्ता रोको मध्ये अडकल्याने सकल मराठा समाजाच्या तरुणांनी समजूतदारीची भूमिका घेऊन निषेध व्यक्त करत. रस्ता रोको आटोपता घेतला.

यावेळी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, तुकाराम शिंगटे, बाळासाहेब काळे, एकनाथ काळे, मच्छिंद्र आर्ले, राजेश लोंढे, भाऊराव फटांगरे, गणेश शिंदे, हरिचंद्र जाधव, संजय फाटके, राजु झिरपे, दिपक सामृत, कृष्णा जाधव, प्रशांत सामृत, महेंद्र खरड, पत्रकार शहाराम आगळे आदिंनी रास्ता रोकोसाठी परिश्रम घेतले.

यावेळी चारही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी राजेंद्र आढाव म्महणाले कि, मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडत आहेत. मात्र, आता शासन वेळ काढून पणाची भूमिका घेत असल्यामुळे मराठा समाजाचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा अंत पाहू नये. संग्या सोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी सह इतर मागण्या मान्य कराव्यात व मराठा समाजाला न्याय द्यावा.