शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : तालुक्यातील एका गावात पाटलाच्या इथे सुवासिनी म्हणून जेवायला जायचे आहे. असे सांगत बळजबरीने मोटारसायकलवर बसवून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना शुक्रवार रोजी घडली आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे सदर मुलींचे वडील साखरपुड्याचे निमित्ताने ता. गेवराई जि. बीड येथील एका गावात गेले असता. त्यांना त्यांच्या मित्राने फोनवर संपर्क साधून कळविले की, त्यांचा मित्र नगर येथून गावी येत असताना, फिर्यादीच्या दोन मुली व त्याच्या भाचीला, गावातील एका युवकाने मोटारसायकलवर करंजी घरातून घेऊन जात असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिसले. तो युवक नगरच्या दिशेने गेल्याचे सांगितले.
यावेळी तिन्ही मुली रडत असल्याचे दिसल्याने, संबंधिताने त्याची दुचाकी वळवत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, तो युवक त्या मुलींना तोपर्यंत घाट चढून पसार झाला होता.
याबाबत साखरपुड्याच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेल्या मुलीच्या वडिलांनी खात्री करण्यासाठी घरी संपर्क साधला असता, त्यांना असे कळाले की, गावातील, युवक सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारच्या मुलीसह, त्याच्या दोन मुलींना त्या युवकाने हाताला धरुन पाटलाच्या इथे सुवासिनी जेऊ घालायच्या आहेत, असे सांगून घेऊन गेला आहे.
त्यानंतर त्या युवकासह मुलींचा शोध घेतला असता मिळून न आल्याने रात्री उशिरा याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.