कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : तालुक्यातील उक्कडगाव येथील शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा इसमांना ग्रामस्तांनी चोप देवुन पोलीसांच्या स्वाधीन केले व अपहरणाचा कट उधळून लावला. हि घटना तालुक्यातील उक्कडगाव येथे घडली.
उक्कडगाव येथील पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षे वयाच्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण या दोघाना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींविरुद्ध मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला . दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत उत्तम विष्णू निकम यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा हा शाळेत जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी बेटा इकडे ये, आमच्या सोबत गाडीवर बस, आम्ही तुला शाळेत सोडून देतो असे म्हणाले. सदर मुलाने घटनास्थळावरून धूम ठोकली. एका घरात जाऊन त्याने त्या महिलेला सांगितले व पुन्हा आपले घर गाठले.
थोड्यावेळाने सदर मुलगा पुन्हा दप्तर घेवून शाळेत जाण्यास निघाला. वरील आरोपी त्याच्या समोर परत आले. त्यांनी त्यांची मोटार सायकल रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यांना पाहताच सदर मुलाने पुन्हा धूम ठोकली. पुन्हा त्याच महिलेच्या घरात घुसला व सर्व प्रकार सांगितला. सदर महिलेच्या मुलाने फिर्यादीस फोन करून घटना सांगितली.
फिर्यादीने गावकऱ्याना फोन करून रोडवरील त्या दोन आरोपींना पकडा म्हणून सांगितले. फिर्यादी व काही ग्रामस्थांनी आरोपींना पकडले. त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांची त्यांची नावे अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण (रा. कठोरा बाजार ता. भोकरदन, जिल्हा जालना ) असे सांगितले. ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना चांगला चोप दिल्याचे समजते. अखेर गावकऱ्यानी पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली.
पकडलेले दोन्ही आरोपी व त्यांची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत या घटनेमुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मिडीयावर पोर धरी आल्याची बातमी व्हायरल झाली. आरोपींकडे दुचाकीच्या डिकीत लाकडी दांडे, करवती, कटावणी असे साहित्य मिळून आल्याचे गावकर्यांनी सांगतिले.