पॉज मशीन सर्व्हर डाऊन झाल्याने लाभार्थींना स्वस्त धान्य मिळेना

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : आधुनिक काळ यांत्रिकीकरणाचा आहे, त्यामुळे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. यांत्रिकीकरणामुळे कामाचा उरक वाढतो तसेच कामात पारदर्शकता ही येते म्हणूनच सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सरकारमान्य धान्य दुकानातून धान्य देण्यास राज्यभर सध्या पॉज मशीनचा  उपयोग  करणे सुरु झाले. मात्र पॉज मशीन सर्व्हर यंत्रणा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असल्याने राज्यभर गोरगरीब लाभार्थींना धान्य मिळणे जिकीरीचे ठरले आहे. एकट्या शेवगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यात पॉज मशिनच्या व्यत्ययामुळे अवघे ४५ टक्के धान्याचे वाटप होऊ शकले. ही वस्तुस्थिती आहे.

म्हणूनच  गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या  कुटुंबीयांना त्यांचे हक्काचे मोफत धान्य त्वरित देण्याची व्यवस्था करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रीतम गर्जे यांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शेवगाव तालुक्यात ९ हजार ७५७ अंत्योदय कार्ड धारक तर ३८ हजार ६६४ प्राधान्य कार्ड धारकांची संख्या असून अंत्योदय कार्डधारकाला माहिन्याला १५ किलो गहू व २० किलो तांदूळ असे प्रत्येकी ३५ किलो धान्य मोफत मिळते. तर प्राधान्य कार्ड धारकांना माणसी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत दिला जातो. अलीकडे  सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सरकार मान्य धान्य दुकान सुरू असलेले धान्य वितरण सर्व्हर प्रणालीत बिघाड होत असल्याने वितरण व्यवस्था अत्यंत  विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लाभार्थी बरोबरच दुकानदार देखील त्रस्त झाले आहेत.

  सकाळी दुकान उघडले की दोन चार कार्डधारकांना धान्य दिले की मध्येच सर्व्हर डाऊन होते.  तासंतास वाट पहात सर्वांनाच तिष्ठत रहावे लागते. ग्रामिण भागात सध्या शेती हंगामाचे दिवस असल्याने सर्वांनाच कामावर जाण्याची ओढ लागते. कितीवेळ वाट पहावी हे निश्चीत नसल्याने कामगाराची रोजंदारी बुडते आणि बहुतेक रेशन दुकानदारांनाही चरितार्थासाठी फक्त एवढ्याच व्यवसायावर अवलंबून रहाणे शक्य नसते.

रेशन दुकानदारांना धान्य वितराणा बरोबरच  लाभार्थी शिधापत्रिका धारकांच्या प्रत्येक सदस्याची ई केवायसी करण्यासारखी अन्य कामेही असतात. अशा प्रतिक्रिया स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मीना कळकुंबे तसेच तालुका अध्यक्ष पोपट पाखरे यांनी  व्यक्त केल्या. म्हणून यातून जास्तीत जास्त लवकर मार्ग काढणे गरजेचे असून  मोफत धान्याचा लाभार्थींना वेळीच लाभ मिळणे गरजेचे आहे. शासनाच्या मोफत धान्य योजनेचा त्वरित लाभ द्यावा अन्यथा या संदर्भात उग्र जनआंदोलन उभारावे लागेल असा इशाराविविध संघटनांनी दिला आहे.