मतदारांनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार – आ. आशुतोष काळे

आमदार आशुतोष काळेंनी मानले मतदारांचे आभार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी मताधिक्य दिले त्या गावांना दिला आणि ज्या गावातून मताधिक्य मिळाले नाही त्या गावांना पण तेवढाच निधी देवून निधी वाटपात भेदभाव केला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले, प्रचारा दरम्यान केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देवून केलेल्या विकासकामाची पावती दिली. त्यात लाडक्या बहिणींची भर पडल्यामुळे एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिकची जबाबदारी आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडू असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला दिला.

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे सोमवार (दि.२३) रोजी विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपून त्यांचे पहिल्यांदाच मतदार संघात आगमन झाले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदार संघातील जनतेचे आभार व्यक्त करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.अशोकराव काळे होते.

यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला कधीही सहज घेतले नाही व कार्यकर्त्यांना देखील निवडणूक हलक्यात घेवू नका असे आवाहन केले होते. त्यामुळे प्रचारा दरम्यान आजारी असतांना देखील प्रचाराचा जोर कमी होवू न देता केलेल्या विकासकामांवर मते मागितली.कार्यकर्त्यांनी देखील शिस्तबद्ध प्रचार करून मतदान घडवून आणले व लाडक्या बहिणींनी देखील भरभरून मतदान दिल्यामुळे ऐतिहासिक विजय मिळाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, मोठी जबाबदारी देतो असा शब्द दिला होता. त्यामुळे मतदार संघातील जनतेला मंत्रीपदाची अपेक्षा लागली होती.

परंतु निवडणुका ह्या राजकीय नेतृत्वासाठी एक प्रकारची अग्निपरीक्षा असते आणि त्यांनतर मंत्रिमंडळात सहकारी सदस्यांची निवड करणे हि त्यापेक्षा मोठी अग्निपरीक्षा असते. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले. राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजपाचे १३२ व सहकारी शिवसेना पक्षाचे ५७ आमदार निवडून आले आहेत. ४३ पेक्षा जास्त मंत्री होवू शकत नाही. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वाट्याला दहा मंत्रीपद आली.

मतदार संघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत रहावी यासाठी आ. आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी भोजडे येथील सलीम शेख या कार्यकर्त्याने पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता. त्या कार्यकर्त्याचे आ. आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाय धुवून कृतज्ञता व्यक्त केली. यावरून नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते किती दृढ आणि किती विश्वासाचे असते हे सिद्ध झाले.

४१ आमदारांमध्ये १० मंत्रीपद कसे वाटणार हा मोठा प्रश्न होता. तरी देखील त्यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्त्यांनी मुंबई सोडूच नका असे प्रेमरुपी आदेशपण दिले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेवून अजितदादांपुढे मांडल्या. मला विश्वास आहे अजितदादांचा वादा हा संपूर्ण राज्याला माहित आहे. अजून पाच वर्ष संपलेली नाही त्यामुळे अजितदादा मतदार संघातील जनतेला दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करतील असा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

मतदार संघाच्या विकासाचे बहुतांश प्रश्न सोडविले असले तरी उर्वरित प्रश्न यापुढील काळात सोडवायचे असून सर्वात महत्वाचा असलेला सिंचनाचा प्रश्न सोडवीण्यासाठी तसेच निळवंडे, गोदावरी, पालखेड व एक्सप्रेस कालव्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याची मदत होणार आहे. निवडणुकीवेळी महायुतीचा उमेदवार या नात्याने विरोधकांकडे गेलो त्यांनी मदत केली, सहकार्य केले त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी व लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जाणार आहे त्यावेळी कार्यकर्त्यांनी गैरसमज करू घेवू नये असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यासाठी मतदार संघातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता काळे कुटुंबाचा सदस्य असून काळे कुटुंबाकडे माणसांची कमी नाही हे मागील पाच वर्षात जनतेने पाहिले आहे.  दादा आमदार तर कार्यकर्ते आमदार आहेत त्यामुळे मोठ्या मताधीक्यामुळे आ.आशुतोषदादा काळे यांच्या बरोबरच प्रत्येक कार्यकर्त्याची पण जबाबदारी वाढली आहे. आपल्या गावातील विकासाच्या समस्या व अडचणी आ.आशुतोषदादा काळे यांच्यापर्यंत लवकर पोहोचवून त्या सोडवून घ्या. निवडणूक प्रचाराची जबाबदारी पार पाडत असतांना काळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य धावपळ करीत होता. मात्र जे मागील पाच वर्षात प्रत्येकाच्या दु:खात सामील झाले. ज्यानी आपल्या वयाचा विचार केला नाही की, दिवस रात्र पाहिला नाही ते मा.आ.अशोकदादा काळे यांनी सर्वात जास्त धावपळ केली. त्यावेळी मला जाणवले की, अशोकदादा वाघ आहेत आणि ते योग्य वेळी डरकाळी फोडतात. – सौ.चैतालीताई काळे    

   यावेळी महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवन, पद्माकांत कुदळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, नारायणराव मांजरे, धरमचंद बागरेचा, एम.टी. रोहमारे, बाबासाहेब कोते, डॉ.अजय गर्जे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनील गंगूले, काकासाहेब जावळे, आनंदराव चव्हाण, वसंतराव दंडवते, संजय शिंदे, सोमनाथ चांदगुडे, संभाजीराव काळे, तहसीलदार महेश सावंत आदींसह सर्व संचालक, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कारखाना व संलग्न संस्थांचे अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवनयांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यासह मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पद्माकांत कुदळे, नारायणराव मांजरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.