विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा  –  सुनिल तटकरे 

 दिशा विकासाची पुरोगामी विचारांची, शिर्डी राष्ट्रवादी शिबिराची सुरुवात

शिर्डी प्रतिनिधी, दि. १८ :  पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची संघटनेची दिशा घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी  शिबीरात दिले. सन २०४७ पर्यंत एक बलवान पक्ष तयार करण्याची जबाबदारी आपली असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ करत मनाशी खूणगाठ बांधायची आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. 

या शिबिरात सदस्य नोंदणीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यामध्ये दहा प्राथमिक आणि एक क्रियाशील कार्यकर्त्याची नोंदणीचा समावेश होता. शिबीराची सुरुवात पक्षाचे झेंडावंदन करुन करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

पहिल्या दिवशी झालेल्या ‘नवसंकल्प’ शिबीरात ‘राज्याची राजकीय सद्यस्थिती व वेध भविष्याचा’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तर ‘वाढते नागरीकरण आणि पक्ष बांधणीचे आव्हान’ या विषयावर नजीब मुल्ला, राजलक्ष्मी भोसले यांनी विचार मांडले. महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह विभागवार जिल्हाध्यक्षांनी आपले विचार मांडले. ‘महिला सक्षमीकरणात राष्ट्रवादीचे योगदान’ या विषयावर अदितीताई तटकरे,’ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आणि पक्ष बांधणी’ यावर ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी तर ‘कृषी क्षेत्राचे धोरण’ यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ‘राज्याच्या विकासात आदिवासी समाजाचे महत्त्व आणि योगदान’ याविषयावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विचार मांडले. 

नवसंकल्प शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते नवाब मलिक,मंत्री हसन मुश्रीफ,मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे स्टार प्रचारक अभिनेते सयाजी शिंदे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आहे. या शिबिरामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारले आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७  जागा पूर्ण ताकतीने लढून मुंबईसह राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणार आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मुंबईमध्ये अनेकांवर हल्ले होत आहे. मात्र हल्ला होणारा व्यक्ती हिंदू किंवा मुस्लिम नसतो. त्याला जातीय रंग देण्याचा काही अर्थ नाही. तसेच जितेंद्र आव्हाड व संजय राऊत यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाहीत. नितेश राणे यांचे वक्तव्य हे वैयक्तिक असते त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांचा पक्षही सहमत नसतो. त्याचप्रमाणे बाबा सिद्धकी यांच्या हत्तीची सुपारी देणाऱ्या अनेक बिल्डरांची नावे मी मुंबई पोलिसांना दिलेले आहे तरी त्यांनी कोणताही तपास केलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. –  झिशान  सिद्दिकी

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे व पक्षाचे ध्येयय धोरणे समजून सांगणे गरजेचे असल्याने हे चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या विचारसरणीस जोडले गेलेले अनेक नेत्यांनी मागील निवडणुकीत काही वेगळे भूमिका घेतल्या होत्या, मात्र पुन्हा पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे. छगन भुजबळ हे नाराज नाहीत. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही सगळे मिळून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करत आहोत. आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा तसेच कार्यकर्त्यांचा विचार घेऊन महायुती ठेवायची की स्वतंत्र लढाईचे हे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील. – प्रफुल्ल पटेल

पक्षाचे शिबीर आहे. साई बाबांचे देशात वेगळी ओळख आहे. याठिकाणी देखील साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या अनेक समाधी आहे. यांच्या दक्षिणापेटीत येणारा पैसा हा साईबाबा संस्थान ट्रस्ट व राज्य शासनाच्या ताब्यात असून याच ठिकाणी असलेल्या हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीवरील पैसा सगळा काही स्थानिक लोकं घेऊन जातात .तो पैसा सरकारने व विश्वस्त मंडळाने घ्यावा. याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन निर्णय घेतला जाईल. – आ. संग्राम जगताप)

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला देखील तयार आहे  आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत.  बीड प्रकरणांमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. न्यायालय दोषी की निर्दोष हे ठरवते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. मंत्री मुंडे यांच्याबाबतीत फक्त आरोप होत आहेत. नुसत्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. प्रकरणाचा शोध लागला पाहिजे आणि दोषींना शिक्षाही झाली पाहिजे. पण जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. अजितदादांनी देखील याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत काही आढळल्यास पक्ष नेतृत्व हमखास भूमिका घेईल. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावर विचार करून स्वबळावर लढवेल, असे म्हटले होतं. महायुतीमध्ये काम करत असताना आमचे सर्वांचे महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचा विचार आहे. मात्र स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी वेगळे निर्णय घेतले तर त्याबाबतही पक्ष विचार करणार असून पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरून स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत विचार करेल असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. – दिलीपराव वळसे पाटील

महापालिका निवडणूक आता स्वबळावरच लढली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाला अजूनही मुंबई जिंकता आलेली नाही. येथील यश फार नाही.  पक्षाची ताकद निर्माण करायची असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.  दरम्यान शिर्डीतील राष्ट्रवादी पक्ष शिबिरात पत्रकारांसाठी  स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. परंतु शिबीर ज्या सभागृहात सुरू होते तेथे प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मंत्रिपद न मिळालेले अजित पवारग टातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. शिबिराच्या व्यासपीठावरून केलेल्या पक्षांतर्गत नाराजीचे पडसाद बाहेर जाऊ नये म्हणून पत्रकारांना शिबिरापासून दूर ठेवण्यात आले आल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.