कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या हल्ल्यात जे निष्पाप पर्यटक नागरिक शहीद झाले, त्यांना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व संताप व्यक्त केला असून, या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दहशतवाद हे मानवतेविरोधी कृत्य असून, अशा हिंसक प्रवृत्तींना कोणतेही स्थान नाही. आपल्या नागरिकांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सजग आणि एकजुटीने केंद्र सरकार जी पावले टाकणार आहे त्यासोबत उभे आहेत असे मत कोल्हे कुटुंबीयांनी व्यक्त केले.

केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अशा प्रकारच्या घटनांवर सक्षमपणे नियंत्रण ठेवतील व भविष्यात असे हल्ले पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलतील, यावर आमचा विश्वास आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाचा आढावा घेतला आहे.

या घटनेनंतर देशाची जी भावना निर्माण झाली आहे, त्यातून ही कृत्य करणाऱ्या दहशतवादाचा बीमोड करणे गरजेचे आहे अशी भूमिका सरकारने घेतली आहे त्यामुळे दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला जाणार आहे. या घटनेत महाराष्ट्र राज्य सरकार कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक सुखरूप परत घेऊन येण्यासाठी मंत्रिमंडळाच्या समवेत कार्यवाही सुरू केली आहे.
