विकासाचा महामेरू गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती, निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीपासून ते प्रशासनातील कुशलतेपर्यंत, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचे सुसंगत आणि वास्तवदर्शी मांडणी करतांना या सर्व कार्याचा अचूक वेध तरुण, सुसंस्कृत व सुशिक्षित नेतृत्व आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतील ‘विकासाचा महामेरू’ या ग्रंथातून घेण्यात आला असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

 कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून व देवळाली प्रवरा येथील पत्रकार गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकासाभिमुख दूरदृष्टी व दैदिप्यमान कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.०७) रोजी मुंबईतील ‘हॉटेल ट्रायडंट’ येथे पार पडला या प्रसंगी भुजबळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आ.दिलिपराव वळसे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, आ.शिवाजीराव गर्जे, आ.आशुतोष काळे, आ.संग्राम जगताप, आ.किरण लहामटे, आ.काशिनाथ दाते, आ.दिलीपराव बनकर, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, कोषाध्यक्ष संजय बोरगे, पत्रकार श्रीकांत जाधव, ऋषि राऊत, महेश गिरमे तसेच राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथात अजित पवारांच्या कार्यशैलीतील शिस्त, पारदर्शकता, नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले आहेत. विकासाच्या विविध प्रकल्पांमधून त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रचीती ग्रंथाच्या प्रत्येक पानावर मिळते. राज्याच्या विकासाच्या पाठीमागे असलेल्या दूरदृष्टीच्या आणि प्रामाणिक नेतृत्वाचे हे जिवंत दस्तऐवजीकरण आहे.

त्यांच्या बहुआयामी कार्याचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या भक्कम योगदानाचा आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘विकासाचा महामेरू’ हा गौरव ग्रंथ म्हणजे केवळ गौरव नव्हे तर अजितदादांच्या प्रेरणादायी कार्याची नोंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, विद्यमान व माजी आमदार तसेच राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार हे फक्त एक कुशल प्रशासक नसून, महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकातील नागरिकांच्या उन्नतीसाठी झटणारे खरे लोकनेते आहेत. ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथात त्यांच्या कार्यशैलीतील शिस्त, पारदर्शकता, नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असून हा ग्रंथ नव्या पिढीला प्रेरणा देईल.- .आशुतोष काळे.

Leave a Reply