कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : राज्यात आपल्या वैशिष्टयपुर्ण प्रयोगाने ओळख असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी दिली.

ते म्हणाले की, संचालक विलासराव वाबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपालीताई वाबळे या उभयतांच्या शुभहस्ते विधीवत पुजेने सदर दिवशी गव्हाणीत मोळी टाकुन ६३व्या गळीत हंगामाची सुरूवात होत आहे.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगांचा अभ्यास करत महाराष्ट्र राज्यासह देशातील साखर उद्योगाला आधुनिक उपक्रमांची जोड देत सहकारातुन शेतकरी सभासद व त्यावर अवलंबुन असणा-या घटकांची प्रगती साधली आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे अभ्यासु युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक व व्यवस्थापनाच्या मदतींने यंदाच्या हंगामात आवश्यक तेथे मशिनरीमध्ये आधुनिकतेची जोड देत बदल केले आहे. संजीवनीचे युनीट क्रमांक दोन म्हणून रानवड कारखानाही या हंगामापासून सुरू करण्यांत येणार आहे. सहकारी तत्वावरील देशातील पहिला बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्प संजीवनीने सुरू करत नाविन्यता जपली आहे.

तरी या गळीत हंगाम कार्यक्रमांस जास्तीत जास्त सभासद शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक त्र्यंबकराव सरोदे यांच्यासह सर्व संचालक तसेच साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे आदींनी केले आहे.


